प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या काही भागात कचराकुंडी नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवून देखील अन्य नागरिकांकडून परिसर अस्वच्छ करण्यात येत असल्याने अयोध्यानगर येथील रहिवाशांची डोकेदुखी वाढली आहे. या भागात कचराकुंडी नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकून परिसर अस्वच्छ करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या भागात कचराकुंडीची व्यवस्था करावी, अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे.
या भागातील नागरिक दररोज आपल्या घरातील कचरा घंटागाडीकडे देतात. तसेच आठवडय़ातून एखाद्यावेळी रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱयाची उचल करण्यात येते. मात्र कचऱयाची उचल करून परिसराची स्वच्छता करण्यात येत असली तरी दुसऱया दिवशी पुन्हा त्याच जागेवर कचरा साचलेला दिसून येतो.
या भागात एकही कचराकुंडी नसल्याने नागरिक रस्त्यावर किंवा खुल्या जागेत कचरा टाकत आहेत. तसेच येथील भागात अनेक हॉस्पिटल्स असल्याने रुग्णांचे नातेवाईक जेवण, नाष्टा करून पार्सलच्या पिशव्या इतरत्र फेकत आहेत. त्यामुळे समस्या निर्माण झाली असून अस्वच्छ परिसरामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे या भागात कचराकुंडीची व्यवस्था करावी. जेणेकरून नागरिक कचराकुंडीत कचरा टाकतील, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.