80 टक्के तरुण पिढीजात व्यवसायाकडे पुन्हा वळले : टाळेबंदीनंतर ‘भगवान राम पावला‘ असे काढले उद्गार
राम की पैडी येथून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर कुंभारांचे गाव जयसिंहपूर आहे. गावातील कुंभारांना श्रीराम जन्मभूमी पूजन सोहळा भव्य करण्यासाठी प्रशासनाकडून 1 लाख पणत्यांची ऑर्डर देण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे बेहाल झालेल्या कुंभारांसाठी ही ऑर्डर एखाद्या संजीवनीप्रमाणे आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त अयोध्येत लाखापेक्षा अधिक दिवे पेटविले जाणार आहेत. या लाखो दिव्यांच्या निर्मितीची जबाबदारी जयसिंहपूरमधील ग्रामस्थांना देण्यात आली आहे.
घरातील पुरुष इलेक्ट्रिक चाकावर पणत्या तयार करत आहेत. तर तरुण आणि महिला तयार पणत्या उन्हात ठेवण्यासह रंगकाम करत आहेत. काही वर्षांपूर्वी मंदिरांमध्ये प्रसाद तसेच अन्य संबंधित कारणांसाठी मातीच्या भांडय़ांचा वापर व्हायचा. हॉटेल्समध्ये मातीची कुल्हड आणि ग्लास असायचे. परंतु कालौघात मातीची जागा प्लास्टिकने घेतल्याने कुंभार समुदायाचा रोजगारच अडचणीत आला. या कारणामुळे तरुण पिढीजात व्यवसायापासून दुरावले होते.
मागील 3 वर्षांपासून अयोध्येत दीपोत्सव साजरा केला जात असल्याने जयसिंहपूर येथील कुंभारांची स्थिती सुधारली आहे. रोजगारासाठी शहरांमध्ये धाव घेतलेले युवक टाळेबंदीत गावी परतले असून त्यांच्या हाताला आता कामही मिळाले आहे. गावातील सुमारे 80 टक्के तरुण पिढीजात व्यवसायाशी जोडले गेले आहेत. भविष्यातही या व्यवसायाला असेच चांगले दिन असतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
टाळेबंदीत मातीच्या भांडय़ांना खरेदीदार मिळत नव्हता. तसेच मंदिरे बंद असल्याने पणत्याही विकल्या जात नव्हत्या. शिल्लक असलेली बचत संपुष्टात येण्याच्या भीतीने ग्रामस्थ चिंतेत पडले होते. परंतु प्रभू श्रीरामांनी आमचे दुःख दूर केल्याचे उद्गार ग्रामस्थांनी काढले आहे. श्रावणमासात भूमिपूजनासाठी घरबसल्या मोठे काम मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शासकीय मदत
राज्य सरकारने 2018 मध्ये कुंभारांना इलेक्ट्रिक चाक दिले असून ते मोटरद्वारे संचालित होते. याची किंमत सुमारे 16 हजार रुपये असून त्याच्या मदतीने कामाचा वेग दुप्पट होतो. तसेच अन्य अवजारेही राज्य सरकारने ग्रामस्थांना पुरविली आहेत. ग्रामस्थांना माती उपलब्ध व्हावी याकरता भूखंड देण्यात आला आहे.
…तर स्थिती सुधारणार
30 वर्षांपूर्वी मंदिरांमध्ये बहुतांश प्रसाद मातीच्या भांडय़ांमध्ये तयार केला जात होता. परंतु प्लास्टिक उपलब्ध झाल्यापासून मंदिर तसेच दुकानदारांनी कुंभारांना दूर लोटल्याने त्यांची उत्पादने बाजारपेठांमधून दूर होत गेली. किमान अयोध्येत मंदिरांमध्ये मातीच्या भांडय़ांमध्ये प्रसाद तयार करण्याचा नियम लागू करावा. या निर्णयामुळे प्लास्टिकचा कचरा टाळला जाईल आणि आम्हालाही लाभ होईल असे कुंभार समुदायाच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.
शासकीय दस्तऐवजांमध्ये रामलल्ला विराजमान यांची नोंद
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिर उभारणीच्या कार्याचा शुभारंभ बुधवारी करणार आहेत. तत्पूर्वी रामलल्ला विराजमान आता शासकीय दस्तऐवजांनुसार 2.77 एकर जमिनीचे मालक झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने ‘रामलल्ला विराजमान’ या नावाने भूखंड नोंदविला आहे. जिल्हा प्रशासनाने महसूल नोंदीत रामलल्ला विराजमानला भूखंडाचा मालक म्हणून उल्लेखिले आहे. याचदरम्यान केंद्र सरकारने अधिग्रहित केलेली 70 एकर जमीन यापूर्वीच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली आहे. भूखंडाचा मालकी हक्क प्राप्त झाल्याने अयोध्येत मंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
लखनौमध्ये राष्ट्रीय पर्व तसेच उत्सव समितीकडून भूमिपूजनाच्या 3 दिवसीय कार्यक्रमानिमित्त विशेष तयारी करण्यात आली आहे. तेथील 114 चौकांमध्ये भगवान श्रीरामाची चित्रे आणि ध्वज लावले जाणार आहेत. चौकांना सजविण्याचे काम सोमवारीच पूर्ण करण्यात आले आहे. 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
भगवान श्रीराम सर्व समुदायांचे!
भूमिपूजनाची निमंत्रणपुस्तिका स्वीकारल्यावर इक्बाल भारावले
उत्तरप्रदेशच्या अयोध्येत बुधवारी होणाऱया राम मंदिर भूमिपूजनासाठी निमंत्रणपत्रिका पाठविण्यात येत आहेत. सोमवारी कार्यक्रमाची पहिली निमंत्रणपत्रिका बाबरी मशिदीचे पक्षकार राहिलेल्या इक्बाल अंसारी यांना पाठविण्यात आली आहे. निमंत्रण मिळाल्यावर अंसारी अत्यंत आनंदी दिसून आले आहेत. मंदिर उभारणीची पहिली निमंत्रणपत्रिका मला मिळावी ही राम यांचीच इच्छा असावी असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
कोरोना संकटादरम्यान 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंदिर उभारणीसाठी पहिली वीट रचली जाणार आहे. या सोहळय़ाकरता निवडक व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले आहे. यात अंसारी तसेच अन्य मुस्लीम पक्षकार हाजी महबूब यांचाही समावेश आहे. अंसारी यांनी पंतप्रधान मोदींचे रामनामी पटका (फेटा)द्वारे स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याचबरोबर मोदींना रामचरितमानस भेट करण्याची इच्छाही अंसारी यांनी दर्शविली आहे.
रामनगरीत राहणे आमचे सुदैव
भूमिपूजन सोहळय़ात भागीदार होऊन मला मंदिर उभारणीत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या बाजूने निर्णय देत वाद संपुष्टात आणला आहे. राम एका नव्हे तर सर्व समुदायांचे आहेत. आम्ही त्यांच्या नगरीत राहतो, हे आमचे सुदैव आहे. मंदिर उभारणीच्या कार्यात संत आणि त्यांच्या कोटय़वधी समर्थकांसोबत आम्ही आहोत. म् अयोध्येच्या विकासासह आमच्या समुदायालाही रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अयोध्या रेल्वेस्थानकाचा लवकरच कायापालट
प्रवाशांना मिळणार विशेष सुविधा : 104.77 कोटींचा निधी उपलब्ध : दोन टप्प्यांमध्ये होतोय विकास
पौराणिक आणि आध्यात्मिक नगरी अयोध्येतील रेल्वेस्थानकाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने वेगाने काम होत आहे. तेथे प्रवासी सुविधा, स्वच्छता, सौंदर्य आणि विविध सुविधा उच्च गुणवत्तेसह उपलब्ध करण्याच्या दिशेने प्रयत्न होत आहेत.
मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची जन्मभूमी असल्याने अयोध्यानगरी भारतीय समाजात भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र राहिली आहे. याच महत्तेपायी अयोध्येतील रेल्वेस्थानकही विशेष स्थान बाळगून आहे. भारतीय रेल्वेकडून 104.77 कोटी रुपयांच्या निधीद्वारे या स्थानकाचा कायापालट केला जात आहे.
या स्थानकाच्या इमारतीची निर्मिती रेल्वेच्या राइट्स उपक्रमाद्वारे केली जात आहे. या इमारतीची निर्मिती दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म, सर्क्युलेटिंग आणि होल्डिंग एरियाचा विकास होणार आहे. दुसऱया टप्प्यात नव्या स्थानक इमारतीची निर्मिती आणि अन्य सुविधा उभारल्या जातील.
प्रतीक्षालय सुविधेचा विस्तार करत 3 वातानुकुलित विश्रांतीगृहांची निर्मिती होईल. याचबरोबर 17 बेड असलेले पुरुष डॉरमेट्री प्रसाधन, 10 बेडयुक्त महिला डॉरमेट्री प्रसाधनासह एक अतिरिक्त फुटओव्हर ब्रिज, फूड प्लाझा, दुकाने, अतिरिक्त शौचालये निर्माण केली जाणार आहेत. स्थानकावर पर्यटन केंद्र, टॅक्सी बूथ, शिशू विहार, महनीयांसाठीचा कक्ष, सभागृह आणि विशेष अतिथीगृहाची उभारणी करण्यात येत असून त्याचे काम प्रगतिपथावर आहे. या सर्व विकासकामांचा वारंवार आढावा घेतला जात आहे.