ऑनलाइन टीम / लखनऊ :
अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मुस्लिम पक्षकारांना देण्यासाठी पाच एकर जागा निश्चित करण्यात आल्याचे वृत्त उत्तर प्रदेश सरकारने फेटाळले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकालात मुस्लिम पक्षकारांना पाच एकर जागा देण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात काही माध्यमांमध्ये वृत्त आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने ते फेटाळले.
राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी म्हणाले, या संदर्भात सोशल मीडीयावर पसरलेल्या बातम्या खोटय़ा आहेत. मशीदीसाठी अजून कोणतीही जागा निश्चित करण्यात आली नाही आहे. तसेच राज्य सरकारने या स्वरुपाचा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही.
दरम्यान, अयोध्येतील पंचकोशी परिक्रमेबाहेर जमीन निश्चित करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. अयोध्येतील 15 किलोमीटरच्या पंचकोशी परिक्रमा परिघात सर्व मंदिरे आहेत. त्याबाहेर मुस्लिम पक्षकारांसाठी जमीन निश्चित करण्यात आल्याचे वृत्त होते. पण सरकारने ते फेटाळले.