मंदिर निर्मिती सुर झाल्यावर पहिली निवडणूक : संघ अन् विहिंप कार्यकर्ते पोहोचत आहेत घरोघरी
अयोध्येत भगवान श्रीराम यांचे मंदिर उभारणी सुरू झाल्यावर उत्तरप्रदेशातील ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. अयोध्या आणि परिसरातील गावांमधील चित्र पाहता भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचे मानले जात आहे. याचमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने प्रचार मोहिमेची धुरा सांभाळली आहे. गुजरात, मध्यप्रदेश, नागपूरसमवेत देशभरातील संघ पदाधिकारी अयोध्येत पोहोचले आहेत.
पक्षाने तंत्रज्ञानाचे सामर्थ्य पूर्वीच ओळखले होते. 2015 मध्ये मिस्ड कॉलद्वारे सदस्यत्व मोहीम राबविण्यात आली. उत्तरप्रदेशच्याच 1.25 कोटी लोकांनी सदस्यत्व स्वीकारले होते. प्रत्येक बूथपर्यंत आयटी टीमचे नेटवर्क आहे. अयोध्ये प्रचाराला तीव्र स्वरुप देण्यासाठी 23, 24 आणि 25 फेब्रुवारीला गृहमंत्री अमित शाह यांचा रोड शो होण्याची शक्यता असल्याची माहिती भाजप विदेश संपर्क विभागाचे (अवध क्षेत्र) संयोजक रवि तिवारी यांनी दिली आहे.
विजय आवश्यक
संघाचे लोक घरोघरी संपर्क करून लोकांना सर्वप्रकारची नाराजी सोडून देण्यास सांगत आहेत. अयोध्येत भाजपला प्रचंड विजय न मिळाल्यास जगभरात चुकीचा संदेश जाणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथे भाजपच्या आयटी टीमने पूर्ण शक्तीनिशी मोहीम राबविली आहे. भाजप ओव्हरसीज प्रेंडशिप ग्रूप विदेशात राहणाऱया भारतीयांचे ऑडिओ-व्हिज्युअल संदेश पोहोचवत आहे. शिकागोतूनही धार्मिक अस्मितेची साद घातली जात आहे.
रस्ता रुंदीकरण सर्वात मोठा मुद्दा
अयोध्येत सर्वात मोठा मुद्दा रस्ता रुंदीकरणाचा असल्याचे स्थानिक लोक सांगतात. राम जन्मभूमी, कनक भवन आणि हनुमानगढीला जोडण्यासाठी कॉरिडॉय तयार करण्याचे मास्टरप्लॅन जारी झाले आहे. याच्या मार्गात येणारी सुमारे 5 हजार दुकाने आणि मंदिरे हटविली जाणार आहेत. व्यापाऱयांनी काही दिवसांपूर्वी याच्या विरोधात निदर्शने केली होती. तर सरकार संबंधितांना भरपाई आणि अन्य ठिकाणी वसविण्याचे आश्वासन देत आहे.