रस्ता दुरूस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचा कानाडोळा : वाहनधारकांना धोकादायक : त्वरित दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर अरगन तलाव परिसरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. संपूर्ण रस्ता खराब झाला असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्डय़ांमुळे दररोज अपघात घडत आहेत. या भागातील रस्त्याच्या डागडुजीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने कानाडोळा केला असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कॅन्टोन्मेंट परिसरात येणारे बहुतांश रस्ते खराब झाले आहेत. पण महाराष्ट्र आणि गोवा अशा दोन राज्यांना जोडणाऱया बेळगाव-वेंगुर्ला रोडवर अरगन तलाव परिसरात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता खराब झाला असून, वाहने चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अरगन तलाव परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने येथील रस्ता खराब झाला आहे. तसेच हिंडलगा परिसरात आंबेवाडी क्रॉस, सुळगा, तुरमुरी अशा गावांमधून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. गणपती मंदिर ते अरगन तलावा दरम्यान वेडीवाकडी वळणे असल्याने वाहनांची गर्दी होते. या दरम्यान रस्त्यावर खड्डे पडले असल्याने वाहने चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या दरम्यान संपूर्ण रस्ताच उखडला आहे. या ठिकाणी वाहनधारक खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करीत असतात. यामुळे अपघात घडत आहेत. रस्त्याशेजारी विविध व्यवसाय असल्याने वाहनधारकांना वाहने रस्त्याच्या बाजुला घेणेदेखील मुश्किल बनले आहे.
रेशीम फार्मजवळ तर रस्त्यावर चर खोदण्यात आली होती. हिंडलगा गावाच्या प्रवेशद्वारावरच भलीमोठी चर निर्माण झाली असून, वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे. याच परिसरात दोन मद्यविक्रिची दुकाने असल्याने या दरम्यान वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. अशा अडचणीच्या ठिकाणी वाहने चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची डागडुजी करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली होती. पण केवळ माती घालून नागरिकांची दिशाभूल केली आहे. खड्डे बुजविण्यासाठी घातलेली माती पावसामुळे वाहुन गेली आहे. यामुळे रस्त्यावरील खड्डे जैसेथे आहेत.
रस्त्यांच्या देखभालीच्या नावाखाली लूट
रस्त्याच्या डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने आवश्यक उपाययोजना राबविणे गरजेचे होते. पण याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याच्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्ची घातले जातात. मात्र रस्त्याची स्थिती केवीलवाणी असते. रस्त्यावर पाणी साचू नये याकरिता रस्त्याच्या दुतर्फा साचलेली माती आणि वाढलेले गवत हटविण्यासाठी दरवषी लाखो रुपये मंजूर होतात. पण पावसाळय़ापूर्वी हे काम करण्याऐवजी जानेवारी दरम्यान सदर काम उरकण्यात येते. पण काही मोजक्मयाच ठिकाणी रस्त्याची स्वच्छता करून मंजूर झालेला निधी लाटला जातो. यामुळे रस्त्यांच्या देखभालीच्या नावावर सार्वजनिक बांधकाम खात्याने लूट चालविली असल्याचा आरोप होत आहे.
देखभालीचे कंत्राट मंजूर झालेले कंत्राटदार फिरकूनही पहात नाहीत. यामुळे हे रस्ते खराब झालेले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ट अधिकारी देखील उदासीन आहेत. सदर रस्त्याची पाहणी करून दुरूस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.