ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘घर घर रेशन योजना’ या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी एक पत्र लिहिले आहे. या पत्रात केजरीवाल यांनी ही योजना दिल्लीत सुरू केली जावी अशी विनंती केंद्र सरकारकडे केली आहे.
केजरीवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, दिल्लीतील 70 लाख गरीब जनतेच्या वतीने आपणास विनंती करतो की, सर, प्लीज आपण घरा घरात रेशन पोहचविण्याची ही योजना रद्द करू नका. ही राष्ट्रहिताची आहे, त्यामुळे ही योजना लागू करा असे म्हटले आहे.
पुढे त्यांनी आपल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असे देखील सांगितले आहे की, केंद्र सरकार या योजनेत जे बदल करू इच्छिते त्यासाठी दिल्ली सरकार तयार आहे. जेणे करून दिल्लीतील नागरिकांच्या घरा घरामध्ये रेशन पोहचवले जावू शकते.
पुढे ते म्हणाले, दिल्लीत पुढील आठवड्यापासून घराघरांमध्ये रेशन ही योजना सुरू होणार होती. त्यामुळे गरीब जनतेला रेशन केंद्रसमोर ताटकळत उभे राहण्याची आवश्यकता पडली नसती. तर उलट सरकारने रेशन बँक तयार करून गरिबांच्या घराघरात रेशन पोहचवले असते. मात्र, ही योजना सुरू होण्यापूर्वीच थांबण्यास आली आहे. त्यामुळे जनतेच्या मनात असे का झाले? असा सवाल उपस्थित झाला आहे.
पुढे ते म्हणाले, जनता विचारत आहे की, जर पिझ्झा, बर्गरची घरपोच सेवा मिळते तर रेशनची घरपोच सेवा का मिळत नाही आहे ? दरम्यान, केजरीवाल म्हणाले की केवळ दिल्लीतच नाही तर पूर्ण देशात घरा घरात रेशन पोहचविण्याची योजना जारी केली पाहिजे.