नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बेळगावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा प्रश्न त्या पक्षाचे महाराष्ट्रातील खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केला आहे. त्याच संदर्भात त्यानी सोमवारी शून्य तासात सीमाप्रश्नासंबंधीही वक्तव्य केले. त्यांनी हा प्रश्न मांडताना सीमाभागातील मराठी जनतेला प्रशासनाकडून त्रास दिला जातो असा आरोप त्यांनी केला. स्वातंत्र्यानंतर भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. त्यावेळी बेळगाव कर्नाटकात घालण्यात आले नव्हते, असे विधान त्यांनी केले. याला कर्नाटकातील खासदारांनी आक्षेप घेतला.
शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली. आता महाराष्ट्रातील आपल्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी ते लोकसभेत सीमाप्रश्नासंबंधी पोकळ मुद्दे उपस्थित करून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. बेळगावचा प्रश्न बऱयाच काळापूर्वीच संपुष्टात आला आहे, असाही दावा भाजपचे खासदार शिवकुमार उदासी यांनी लोकसभेत या विषयावर बोलताना केला.