तब्बल 12 दिवसांनंतर केली मुक्तता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अरुणाचल प्रदेशमधील चीन सीमेजवळच्या गावातून बेपत्ता झालेल्या पाच युवकांना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारताकडे सोपवले आहे. लष्करातील सूत्रांनी शनिवारी सकाळी ही माहिती दिली. या युवकांना भारताकडे सोपवण्याची प्रक्रिया चीनच्या भागात पार पडली. 1 सप्टेंबरपासून बेपत्ता असलेले हे पाच युवक तब्बल 12 दिवसांनंतर चीनच्या तावडीतून सुटले आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी ट्विटद्वारे यासंबंधी माहिती दिली आहे.
किबीथू सीमा चौकीवरुन या युवकांनी अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश केला. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मीने या युवकांना भारतीय लष्कराकडे सोपवले. अरुणाचल प्रदेशचे काँग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागातून पाच भारतीयांचे कथितरित्या अपहरण केल्याचा दावा केला होता. अरुणाचल प्रदेशच्या सुबनसिरी जिल्हय़ातील पाच जणांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा एरिंग यांनी पीएमओला टॅग करत आपल्या ट्विटमध्ये केला होता. त्यांनी भारत सरकारकडे तात्काळ कारवाईची मागणी देखील केली होती. आसामच्या तेजपूर शहराच्या जनसंपर्क अधिकाऱयानेही अधिकृत ट्विटरद्वारे याची माहिती देत पुष्टी दिली होती.
जवळपास 12 दिवसांपासून हे युवक गायब होते. चीनच्या सैनिकांनी त्यांचे अपहरण केल्याचे सांगितले जात होते. 7 युवक सुबनसिरी जिल्हय़ातील भारत-चीन सीमा भागात शिकारीसाठी गेले होते. यावेळी 5 युवकांना पकडण्यात आले होते. तर दोन युवक स्वतःला वाचवत कसे तरी परतले होते व त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. त्यानंतर ते चीनच्या तावडीत सापडल्याचे स्पष्ट झाले होते.