जलविद्युतनिर्मिती होणार – ‘ब्रह्मपुत्रा’वर धरण बांधण्यास चिनी संसदेची मंजुरी
बीजिंग / वृत्तसंस्था
भारताला लागून असलेल्या सीमेवर चीनने मोठय़ा जोमाने विकासकामे हाती घेतली आहे. याच विकासकामांतर्गत असणाऱया अनेक प्रकल्पांपैकी ब्रह्मपुत्रा नदीवर धरण आणि जलप्रकल्प उभारण्याच्या हालचाली चीन सरकारने गतिमान केल्या आहेत. भारताने विरोध दर्शवलेला असतानाही चीनच्या संसदेने ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. भारतातील अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या तिबेट प्रांतामध्ये चीन ब्रह्मपुत्रा नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी धरण बांधणार आहे. या प्रकल्पाचा द्विपक्षीय संबंधांवर आणि चर्चांवर परिणाम संभवू शकतो.
चीनमध्ये ब्रम्हपुत्रा नदीला यारलुंग जांगबो या नावाने ओळखले जाते. अरुणाचल प्रदेशमध्ये या नदीला सियांग या नावाने ओळखले जाते. अरुणाचलमधून ही नदी आसाममध्ये प्रवेश करते जिथून तिला ब्रह्मपुत्रा हे नाव पडते. आसाममधून ही नदी बांगलादेशच्या हद्दीत प्रवेश करते. याच नदीवर भारतीय सीमेजवळ मोठे धरण बांधण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. या प्रकल्पामुळे ईशान्य भारतातील राज्यांबरोबरच बांगलादेशमधील पाणीपुरवठय़ावरही परिणाम संभवू शकतो.
चीन उभारणी करत असलेले हे धरण जगातील सर्वात मोठय़ा धरणांपैकी एक असणार आहे. सध्या जगातील सर्वात मोठे धरण असणाऱया थ्री जॉर्जच्या माध्यमातून निर्माण होणाऱया विजेच्या तीनपट अधिक जलविद्युत निर्मिती या धरणाचा माध्यमातून होणार आहे. चीनने यापूर्वीही ब्रह्मपुत्रा नदीवर अनेक लहान आकाराची धरणे बांधली आहेत. मात्र सध्या चीन विचार करत असणारे धरण महाकाय असणार आहे.
संसदेची मंजुरी मिळाल्यामुळे धरणनिर्मितीच्या प्रत्यक्ष कामाला यंदाच प्रारंभ होणार आहे. देशाची सुरक्षा आणि पाणीसाठय़ासंदर्भातील धोरणासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे असे चीनने म्हटले आहे. चीनच्या 14 व्या पंचवार्षिक योजनेत या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली आहे.
भारत-बांगलादेशसमोर पेचप्रसंग
मागील अनेक महिन्यांपासून भारत आणि चीनच्या पूर्व सीमेवर सुरु असणाऱया तणावाच्या पार्श्वभूमीवर धरणनिर्मितीचा निर्णय भारताला डिवचण्याच्या उद्देशानेच घेण्यात आल्याचे समजते. या निर्णयामुळे भारत आणि चीनमधील संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच बांगलादेशमधील पाणीपुरवठय़ावरही या धरणामुळे विपरित परिणाम होणार असल्याने दोन्ही देशांसमोर पेचप्रसंग निर्माण झालेला आहे.