ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :
अरुणाचल प्रदेशात यांगत्सोजवळ तवांग सेक्टरमध्ये चिनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या 200 भारतीय सैनिकांनी चिनी सैन्याला सीमेवरच रोखून घुसखोरीचा डाव हाणून पाडला. कमांडर स्तरावर चर्चा झाल्यानंतर हा वाद निवळल्याचे सांगण्यात येते.
मागील आठवडय़ात यांगत्सोजवळ तवांग सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत असताना भारत-चीनचे सैन्य एकमेकांसमोर भिडले. चिनी सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडत भारतीय सैन्याने उभारलेल्या रिकाम्या बंकर्सना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 200 भारतीय सैनिकांनी चिनी सैन्याला सीमेजवळच रोखून धरले. त्यानंतर काही चिनी सैनिकांना तात्पुरत्या काळासाठी ताब्यातही घेण्यात आले हेते. काही तासानंतर कमांडर स्तरावर चर्चा झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
संरक्षण मंत्रालयानुसार, भारत-चीन सीमेचे औपचारिक सीमांकन केले गेले नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील एलएसीच्या धारणामध्ये फरक आहे. सध्या दोन्ही देशांच्या सीमा वैयक्तिक आकलनावर आधारीत असल्याने अशाप्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र, अशा घटनांवर शांततेत मार्ग काढला जातो.