ऑनलाईन टीम / बीजिंग :
अरुणाचल प्रदेश भारताचा नव्हे तर तिबेटचा भाग आहे. आम्ही कायमच अरुणाचलला चीनच्या दक्षिणेकडील तिबेटचा भाग मानत आलो आहोत, असा दावा चीनने केला आहे. चीनच्या हद्दीत चुकून प्रवेश केलेल्या अरुणाचलच्या पाच जणांविषयी भारताने चीनकडे विचारणा केली असता, त्यावर बोलताना चीनने ही प्रतिक्रिया दिली.
अरुणाचल प्रदेशमध्ये सीमा भागातून चीनच्या सेनेने पाच भारतीयांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. हे पाचही जण सुबनसिरी जिल्ह्यातील राहणारे असून, त्यांची नावेही प्रसिद्ध झाली आहेत. यासंदर्भात भारताने लष्करी स्तरावर चीनकडे विचारणाही केली होती.
भारतीय लष्कराला उत्तर देताना चीनने अरुणाचल प्रदेश चीनच्या दक्षिणेकडील तिबेटचा भाग असल्याचे म्हटले. तसेच भारतीय सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषचे उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे चीनच्या सीमेत प्रवेश केला. तसेच तेथील तैनात चिनी सैन्याला इशारा देण्यासाठी गोळीबार केला, असा आरोपही चीनने केला आहे.