कॅप्टन अमरिंदर अन् काँग्रेसमधील वाद – चौकशीची मागणीची थंडावली
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पाकिस्तानी मैत्रिण अरुसा आलम यांच्यावरून राजकीय वादंग शमण्याची चिन्हे अद्याप दिसून येत नाहीत. कॅप्टनच्या माध्यम सल्लागारांकडून अरुसा आलम यांचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतचे छायाचित्र ट्विट करण्यात आले आहे. हे छायाचित्र समोर येताच राज्याचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी याप्रकरणी आयएसआय कनेक्शनची चौकशी करविण्याच्या मागणीपासून माघार घेतली आहे.
हे दोन देशांमधील प्रकरण असल्याने याची चौकशी रॉ करू शकते असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाला उपमुख्यमंत्री रंधावा यांनीच राजकीय तसेच हेरगिरीचा रंग दिला होता. पण आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी यावरून काँग्रेस पक्षालाच घेरणे सुरू केले आहे. रंधाव यांनी आता चौकशी करण्याची मागणी करणारा स्वतःचा ट्विट देखील हटविला आहे.
अन्य पक्षांचीही उडी
कॅप्टन अमरिंदर आणि अरुसा आलम यांच्यावरून रंधावा यांना शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांनी लक्ष्य केले आहे. कॅप्टन अमरिंदर मुख्यमंत्री असताना रंधावा यांनी हा विषय का उपस्थित केला नाही? शिरोमणी अकाली दल हे प्रकरण प्रारंभापासून उपस्थित करत आहे. पण त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांकडून याला विरोध दर्शविण्यात येत होता. चार वर्षांपर्यंत रंधावा देखील अरुसा आलमसोबत प्रीतिभोजन करत राहिले आहेत असा आरोप बादल यांनी केला आहे. तर रंधावा यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. तर आम आदमी पक्षानेही अरुसा आलम हिच्यावरून कॅप्टन यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
रंधावा यांना प्रत्युत्तर
देशाच्या गुप्तचर यंत्रणांच्या मंजुरीनंतर अरुसा आलमला देशात येण्याची अनुमती देण्यात आली होती असे कॅप्टन अमरिंदर यांनी स्पष्ट केले आहे. तर अवमानाप्रकरणी कॅप्टन यांनी रंधावा यांना प्रत्युत्तर दिले आहे. रंधावा यांच्या शिफारसीनंतरच आपण चौकशीसाठी कुंवर विजय प्रताप सिंह आणि रणबीर सिंह खटडा यांना नियुक्त केले होते. अरुसा आलमची 2007 मध्येच चौकशी झाली होती आणि आपण तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. रंधावा यांनी स्वतःचा वेळ वाया घालवू नये. सणासुदीच्या काळात सुरक्षा व्यवस्थेवर स्वतःचे लक्ष केंद्रीत करावे असा सल्ला कॅप्टन यांनी त्यांना दिला आहे.
असा सुरू झाला वाद
उपमुख्यमंत्री रंधावा हे जालंधर येथील पोलीस स्मृती दिन कार्यक्रमात सामील झाले होते. अरुसा आलम साडेचार वर्षे अमरिंदर यांच्या शासकीय निवासस्थानी राहिल्या होत्या. त्यांच्याविषयी काही गोष्टी समोर येत असून त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. पोलीस महासंचालकांना चौकशी करण्यास सांगणार असल्याचे रंधावा यांनी म्हटले होते. त्यानंतर कॅप्टन रंधावा यांच्यावर बरसले होते. अरुसा 16 वर्षांपासून भारत सरकारच्या मंजुरीनंतर येथे येतेय. रालोआप्रमाणेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारने देखील आयएसआयसोबत हातमिळवणी केल्याचे रंधावा म्हणू पाहत आहेत का? वायफळ बडबड करण्याऐवजी रंधावा यांनी पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष द्यावे असे कॅप्टन यांनी म्हटले आहे.