पहिल्या सराव सामन्यात यजमानांवर 4-3 गोलफरकाने मात
वृत्तसंस्था/ ब्युनॉस एअर्स
भारताच्या पुरुष हॉकी संघाने अर्जेन्टिना दौऱयाची सुरुवात विजयाने केली असून विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या अर्जेन्टिनाला त्यांनी पहिल्या सराव सामन्यात 4-3 अशा गोलफरकाने पराभूत केले.
मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या सामन्यात निलकांता शर्मा (16 वे मिनिट), हरमनप्रीत सिंग (28), रुपिंदर पाल सिंग (33), वरुण कुमार (47) यांनी भारताचे गोल नोंदवले तर ड्रगफ्लिकर लियांद्रो टॉलिनी (32, 53 वे मिनिट) व मायको कॅसेला (41) यांनी अर्जेन्टिनाचे गोल नोंदवले.
‘सराव सामना असला तरी दोन्ही संघांनी तीव्रतेने प्रदर्शन करीत झुंजार खेळ केला. ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या अर्जेन्टिनासारख्या संघाविरुद्ध विजय मिळविणे नेहमीच समाधान देणारे असते. अशा विजयामुळे संघाचा आत्मविश्वासही दुणावतो,’ असे भारतीय संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड म्हणाले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी संथ सुरुवात केली. पण दुसऱया सत्रात भारताने सर्वप्रथम जोर पकडला. शिलानंद लाक्राने भारताला पहिल्या गोलची संधी निर्माण करून दिली. सर्कलमध्ये असलेल्या निलकांताकडे त्याने पास पुरविला आणि त्याने अर्जेन्टिनाच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत चेंडू गोलपोस्टमध्ये अचूक मारला. यानंतर भारताने प्रतिस्पर्ध्यावर वारंवार हल्ले करीत त्यांना बॅकफूटवर ठेवले होते.
भारताच्या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देत अर्जेन्टिनानेही लवकरच पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण अनुभवी भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशने अप्रतिम बचाव करीत त्यांची ही संधी वाया घालवली. 28 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने भारताला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला आणि त्यावर हरमनप्रीतने कोणतीही चूक न करता जबरदस्त फटक्यावर गोल नोंदवून भारताची आघाडी 2-0 अशी केली. तिसऱया सत्रात अर्जेन्टिनानेही जोरदार मुसंडी मारली आणि 32 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर टॉलिनीने अर्जेन्टिनाचा पहिला गोल नोंदवला. पण पुढच्याच मिनिटाला भारताने आक्रमण करीत पेनल्टी कॉर्नर मिळविला. जसकरण सिंगने मिळविलेल्या या पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदर पाल सिंगने भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.
मात्र 42 व्या मिनिटाला अर्जेन्टिनाने भारताची आघाडी 3-2 अशी कमी करण्यात यश मिळविले. कॅसेलाने त्यांचा हा गोल नोंदवला. लवकरच अर्जेन्टिनानेही आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण भारताचा युवा गोलरक्षक कृशन बहादूर पाठकने अप्रतिम बचाव करून त्यांचा हा प्रयत्न फोल ठरविला. शेवटच्या सत्रात भारताने आघाडी कायम राखण्यासाठी झुंजार खेळ केला. 47 व्या मिनिटाला दिलप्रीतने आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळविला. त्यावर वरुणने जोरदार फटका मारत चेंडूला गोलपोस्टची अचूक दिशा दिली. टॉलिनीने 53 व्या मिनिटाला अर्जेन्टिनाचा आणखी एक गोल नोंदवत भारताची आघाडी 3-4 अशी कमी केली. यानंतर सामना संपेपर्यंत भारताने जिगरबाज खेळ करून अखेरपर्यंत आघाडी कायम ठेवत शानदार विजय साकार केला.
‘आम्ही सर्कलमध्ये अनेक संधी निर्माण केल्या आणि त्याचे गोलमध्ये रूपांतरही केले. राष्ट्रीय शिबिरात आम्ही याच गोष्टीवर अधिक भर दिला होता, त्याचे हे फलित आहे,’ असे प्रशिक्षक रीड म्हणाले. 16 दिवसांच्या या दौऱयात भारतीय संघ अर्जेन्टिनाविरुद्ध एकूण सहा सामने खेळणार असून त्यात एफआयएच प्रो हॉकी लीगच्या दोन सामन्यांचाही समावेश आहे. 11 व 12 एप्रिल रोजी हे दोन सामने होणार आहेत.