ऍड.नरेंद्र सावईकर यांचे आवाहन : मोदी सरकारच्या वर्षपूर्तीचा मांडला आलेख
प्रतिनिधी / फोंडा
देशी व स्थानिक उत्पादनांना प्राधान्य आणि प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या हाकेला गोमंतकीय जनतेने प्रतिसाद देण्याची हीच खरी वेळ आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे मंदावलेल्या अर्थकारणाला गती देण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन माजी खासदार तथा भाजपाचे सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर यांनी केले.
केंद्रातील मोदी सरकारला दुसऱया कार्यकाळात एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर, माजी सभापती व प्रियोळ भाजपाचे अध्यक्ष ऍड. विश्वास सतरकर, फोंडा भाजपाचे अध्यक्ष शांताराम कोलवेकर, शिरोडा भाजपाचे अध्यक्ष सूरज नाईक, सरचिटणीस अवधूत नाईक व मडकई भाजपाचे अध्यक्ष प्रदीप शेट हे उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारच्या दुसरा कार्यकाळाची सुरुवात ऐतिहासिक निर्णयांनी झाली आहे. स्वातंत्र्यानंतर रेंगाळत पडलेला काश्मिरसंबंधी 370 कलम हटविण्याचा प्रश्न, देशातील मुस्लीम महिलांची तिहेरी तलाखांतून सुटका, अनेक वर्षे अनिर्णित असलेला अयोध्येतील राममंदिरचा प्रश्न, नागरिकत्व कायदा हे ऐतिहासिक निर्णय घेतानाच, देशाची सुरक्षा, ग्रामीण अर्थकारण, पायाभूत सुविधा, स्वच्छता आदी विविध क्षेत्रात देशाला सक्षम बनविण्यची पावले उचलली आहेत.
गोव्यातील 16 हजार शेतकऱयांना लाभ
अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेली शेती व शेतकऱयांसाठी राबविलेल्या योजनांचे योग्य परिणाम दिसून येत आहेत. देशभरातील साधारण साडेचौदा कोटी शेतकऱयांना रु. 6 हजारांची मदत मिळत असून गोव्यात साधारण 16 हजार शेतकरी या योजनेचे लाभधारक आहेत. देशाच्या आर्थिक सुधारामध्ये पंतप्रधान मोदी यांनी घेतलेले निर्णय व सर्व स्तरातील घटनांच्या विकासाच्यादृष्टीने उचलेली पावले त्यांच्यातील दृरदृष्टी व नेतृत्त्वगुण सिद्ध करतात. देशाने आर्थिक आघाडीवर आज ज्या सुधारणा घडवून आणल्या आहेत, त्याची जी 7 राष्ट्रांनीही दखल घेतली आहे.
पंतप्रधानांच्या पत्राच्या दोन लाख प्रती वितरीत करणार
कोरोना महामारीचे संकट ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी यांनी हाताळले ते देशातील इतर नेत्यांना जमले नाही. त्यामुळे या आणिबाणीच्या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे जगभर कौतूक झाले. संपूर्ण जग जागतिक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहू लागले आहे. लॉकडाऊन पाचव्या पर्वांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला जी पत्रे पाठवून संवाद साधला, त्या पत्राच्या दोन लाख प्रती गोव्यातील घरोघरी पोचवून पंतप्रधानांचा हा संदेश गोमंतकीय जनतेपर्यंत पोचविला जाणार असल्याचे नरेंद्र सावईकर यांनी सांगितले.
आत्मनिर्भरताच देशाला प्रगतीपथाकडे नेईल ः शिरोडकर
राष्ट्रभावनेचे तत्त्व हे सर्वोच्च असून ज्या राष्ट्रांनी ते जोपासले ती प्रगतीपथावर पोचू शकली. आत्मनिर्भरता हा पतंप्रधान मोदी यांनी जनतेला दिलेला मंत्र महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाने हा विचार कृतीत आणला पाहिजे. कोरोनाचे संकट भारताने ज्या प्रकारे हाताळले त्याचे जगभर कौतूक होत आहे, असे सुभाष शिरोडकर म्हणाले. मांगोरहिल वास्को येथे कोरोनाचे रुग्ण सापडले म्हणजे संपूर्ण वास्को लॉकडाऊन करणे हा उपाय नाही. कोरोनासंबंधी अफवा व भिती बागळण्यापेक्षा परिस्थिती समजून घेतली पाहिजे. नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य खात्याच्या नियमांचे पालन करताना, स्वतःमधील प्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर दिला पाहिजे. राज्य सरकारने कोरोनाबाधीत रुग्णांना योग्य ते उपचार देतानाच आत्तापर्यंत परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली आहे, असे त्यांनी नमूद केले.
ओबीसी आरक्षण कायदा हे महत्त्वपूर्ण पाऊल
केंद्रातील मोदी सरकारने इतर मागासवर्गीयांच्या 27 टक्के आरक्षणाबाबत लोकसभेत नवीन कायदा आणून त्याला कायदेशीर मान्यता दिल्याने आरक्षणातील अनेक अडथळे दूर झाले आहेत. ओबीसीमध्ये येणाऱया देशभरातील 19 जातींना त्याचा शैक्षणिक व इतर क्षेत्रात लाभ होणार असल्याचे विश्वास सतरकर यांनी सांगितले.