ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राज्यात 1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी, सोमवारी अर्थमंत्र्यांनी 1 एप्रिल 2022 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पापूर्वी अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे, याचा तपशील देणारे आर्थिक सर्वेक्षण सादर केले. 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 8 ते 8.5 टक्के राहील, असा अंदाज अर्थमंत्री सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 8 ते 8.5 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला. दरम्यान, यंदाही अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. 2 ते 11 फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी 9 ते दुपारी 2 आणि लोकसभेचे कामकाज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने यापूर्वी 9.2 टक्के जीडीपी विस्ताराचा अंदाज व्यक्त केला होता. म्हणजेच एनएसओच्या आधीच्या अंदाजापेक्षा ते कमी आहे. आर्थिक सर्वेक्षण 2021-22 मध्ये अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांची परिस्थिती तसेच विकासाला गती देण्यासाठी करावयाच्या सुधारणांची माहिती देण्यात आली आहे. 2020-21 मध्ये एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 7.3 टक्क्यांची घट झाली होती. भारतीय अर्थव्यवस्थेची लवचिकता सुधारण्यासाठी पुरवठा-बाजूच्या मुद्यांवर या सर्वेक्षणात भर देण्यात आला आहे.