‘तांत्रिक मंदी’चा अंत, तिसऱया तिमाहीत विकासदरवाढ 0.4 टक्के
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केरोनाकाळात अर्थव्यवस्था मंदावल्याने विकासदराचे साडेसात टक्के आकुंचन झाले आहे. मात्र, आता आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत असून विकासदर सकारात्मक पातळीवर पोहचला आहे. सध्याच्या आर्थिक वर्षाच्या तिसऱया तिमाहीत विकासदरात 0.4 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे साडेसात टक्क्यांचे आकुंचन भरून काढून आता अर्थव्यवस्था प्रगतीची झेप घेण्यास सज्ज आहे, असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी करण्यात आले आहे.
स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) या तिमाहीत 36.22 लाख कोटी रूपये इतके होते. 2019-2020 या आर्थिक वर्षाच्या तिसऱया तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर 2020 या काळात ते 36.08 लाख कोटी रूपये होते. गेल्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात उणे 24.5 टक्के इतक्या प्रमाणात घसरण झाली होती. पण आता अर्थव्यवस्था रूळावर येत असून नकारात्मक विकासदराचा काळ मागे पडला आहे, असे सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. गुंतवणूकदारांचा विश्वासही वाढीला लागला आहे.
अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती
बांधकाम, मालमत्ता विकास, ग्राहकोपयोगी वस्तूंची खरेदी, वाहनांची खरेदी या क्षेत्रांमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा खपही वाढला आहे. पेट्रोल-डिझल व वीजेच्या उपयोगात वाढ दिसून येणे याचाच अर्थ अर्थव्यवस्थेला वेग प्राप्त होत आहे, असा होतो. पुढील वर्षी विकासदर या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 11.5 टक्के वाढेल असे अनुमान आहे.
अर्थतज्ञांचे भाकित
या पुढच्या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचे सर्व निकष सुदृढ होतील. केंद्र सरकारने खर्चात वाढ करण्यासाठी थैली सैल सोडली आहे. यासाठी वित्तीय तूट 3.5 टक्क्यांपेक्षा अधिक वाढण्याचा धोकाही पत्करला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशात अधिक पैसा खेळू लागेल. त्यांचे उत्पन्न वाढले की त्यांच्या मागणीतही वाढ होऊन बाजार गजबजू लागतील, असाही अर्थतज्ञांचा होरा असून एकंदर, वाईट काळ मागे पडल्याचे हे सुचिन्ह आहे, असे मानले जात आहे.