ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनामुळे संकटात असलेली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशातील लोकल इंडस्ट्री ग्लोबल करण्याची वेळ आली आहे. जगात भारतीय उद्योगांना मोठ्या संधी असून, जगालाही भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे भारतही पुन्हा विकासाच्या मार्गावर परतेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
सीआयआयला आज 125 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. मोदी म्हणाले, भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भारताला आत्मनिर्भर बनवायचे आहे.लोकल इंडस्ट्री ग्लोबल करायची आहे. त्यासाठी केंद्र सरकार उद्योग जगताच्या पाठीशी आहे. जगात भारतीय उद्योगांना मोठ्या संधी आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी स्वावलंबी बनण्याची गरज आहे.
कोरोना संकटात लोकांच्या जीवाबरोबरच अर्थव्यवस्थाही वाचवायची आहे. अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत करण्यासाठी खासगी कंपन्यांना भागीदारीची संधी मिळेल.आयात कमी करून निर्यात वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. भारताची क्षमता, कल्पकता, टेक्नोलॉजी, संकट व्यवस्थापन, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे भारत निश्चित विकासाच्या मार्गावर परतेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच भारताने कोरोना संकटात 150 देशांना वैद्यकीय मदत केली आहे. तसेच भारतात दर महिन्याला 3 लाख पीपीई किटची निर्मिती होत असल्याचेही त्यांनी सांगितले.