रिझर्व्ह बँक प्रमुखांचे प्रतिपादन, क्रिप्टोकरन्सी अहितकारक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उपलब्ध संकेतांच्या अनुसार देशाची अर्थव्यवस्था झपाटय़ाने सुधारण्याच्या मार्गावर आहे, असे महत्वाचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केले आहे. मंगळवारी ते येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चर्चासत्रात बोलत होते. क्रिप्टोकरन्सी ही देशाच्या लघु आणि मध्यम अर्थव्यस्थेसाठी चिंता निर्माण करणारी आहे, असे बँकेचे स्पष्ट मत असल्याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.
क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून दहशतवादासाठी पैसा उपलब्ध करुन दिला जातो, असे दिसून आले आहे. त्यामुळे संसदेच्या हिंवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवर निर्बंध आणि नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने एक विधेयक सरकारकडून मांडले जाणार आहे. सध्या देशात क्रिप्टोकरन्सीच्या उपयोगासंबंधी निश्चित नियम नाहीत. त्यामुळे ते नियम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
अर्थव्यवस्थेत सुधारणा
कोरोनाचा दुसरा उद्रेक अद्याप संपला नसला तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्वच आर्थिक क्षेत्रांमध्ये मागणी वाढू लागली असून रोजगारही नवे निर्माण होत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीनंतर आता अर्थव्यवस्था उभारी धरत असून बाजारपेठांमध्ये याचे प्रत्यंतर दिसून येऊ लागले आहे. गुंतवणूक वाढविण्यासाठी सरकारने अनेक उपाय केले आहेत. त्यांचे सुपरिणामही आता दिसू लागले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
बँकांमध्ये सुधारणा आवश्यक
बँकांनी आपल्या भांडवल व्यवस्थापनात सुधारणा करणे आवश्यक आहे. गुंदवणुकीचे चक्र गतीमान करण्यासाठी बँकांनी सज्ज झाले पाहिजे. भांडवल व्यवस्थापनाच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेने काही बँकांच्या कार्यपद्धतींवर आणि मॉडेल्सवर लक्ष ठेवले असून त्यांचे परिणाम दिसल्यानंतर पुढचे धोरण आखले जाईल. बँकांच्या थकबाकीवरही नियंत्रण आणण्यात आले असून सप्टेंबर 2021 पासून थकबाकीचे प्रमाण कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.
रोख रकमेचे नियंत्रण
वित्त बाजारात रोख रकमेचे प्रमाण (लिक्विडिटी) समतोल असले पाहिजे. जसे शरीरात पाण्याचे जास्त प्रमाण असणे चांगले नसते, तसे अर्थव्यवस्थेत रोख रक्कम अधिक प्रमाणात असले अहितकारक आहे. रोख रकमेचे प्रमाण पुरेसे असावे पण आवश्यकतेपेक्षा अधिक नसावे यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्नशील आहे. रोख रकमेवर नियंत्रण हे आव्हान असल्याचेही शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले.
स्टार्टअपमध्ये भारत अव्वल
गेल्या दोन वर्षांमध्ये भारत स्टार्टअप कंपन्यांमध्ये जगात अव्वल ठरला आहे. अनेक अशा कंपन्या आज देशात यशस्वीरित्या कार्यरत असून त्यांची उलाढालही वाढत आहे. कोरोना परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नव्या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी अनेक अनोखी उत्पादने या कंपन्या निर्माण करीत आहेत. स्टार्ट अप कंपन्या या भारताचे आर्थिक आशास्थान असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा उभारी धरु लागल्याने भारताची निर्यातही सुधारल्याचे त्यांनी आकडेवारीसह विशद करुन उपस्थितांसमोर स्पष्ट केले.