वार्ताहर/ कराड
आयात केलेल्या कच्च्या तेलाचे दर उतरल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणे अपेक्षित आहे. मात्र नुकसानभरपाईसाठी केंद्र सरकार इंधनाचे दर वाढवून जनतेचे कंबरडे मोडून आपली तिजोरी भरण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थव्यवस्था हाताळण्यात केंद्र सरकारने अक्षम्य चूक केली असून सरकारी कंपन्या, इमारती व मालमत्ता विकून सरकार चालवले जात असल्याचा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध करीत आमदार पृथ्वारीज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी कराडला राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, निवासराव थोरात, नगरसेवक, राजेंद्र माने, इंद्रजीत गुजर, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलिमा येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक राजेंद्र यादव (आबा), शिवराज मोरे, राजेंद्र चव्हाण, वैभव थोरात, अमित जाधव, झाकीर पठाण, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, वैशाली वाघमारे, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, दीपक लिमकर, सूर्यभान माने, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोल्हापूर नाका येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन करून सायकल रॅलीची प्रारंभ करण्यात आला. शहर पोलीस स्टेशन, शाहू चौक मार्गे रॅली दत्त चौकात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून भेदा चौक मार्गे पोपटभाई पेट्रोल पंपावर रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी इंधन दरवाढ व महागाईविरोधात सहय़ांची मोहीम राबवण्यात आली.
आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदी सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयश आलेले आहे. महागाईच्या मुद्यावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून महागाईचा डोंगर सामान्य जनतेसमोर उभा केला आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना मोदी सरकार टॅक्स वाढवून ज्यादा पैसे सामान्य जनतेकडून उकळत आहे. याचे त्यांना काहीही सोयरसुतक दिसत नाही. आज इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर सायकल रॅली आयोजित करून निषेध नोंदविण्यात येत आहे. तसेच पेट्रोल पंपावर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेचा रोष काँग्रेस पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करीत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकारकडे इंधन दरवाढ व महागाई कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे. असे आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.