अर्थचक्राला वेग देण्याची योजना : अर्थसंकल्पीय तूट लक्ष्याची चिंता नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत स्वतःच्या अर्थसंकल्पीय तूट विषयक लक्ष्याला पूर्ण करण्यासंबंधी चिंता करणार नाही. अर्थव्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी भारत खर्च करू इच्छितो असे उद्गार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी काढले आहेत. कंपन्या भांडवलात्मक खर्च सुरूच ठेवतील हे सरकार सुनिश्चित करणार असल्याचेही त्यांनी एका मुलाखतीत नमूद पेले आहे.
सद्यस्थितीत राजकोषीय तुटीच्या आकडय़ावरून मी अजिबात चिंतेत नाही. माझ्यासाठी पैसा खर्च करणे एक मोठी गरज आहे. मागील महिन्यात केंद्र सरकारने कंपन्यांना संकटातून बाहेर काढणे आणि कोरोना महामारीमुळे गमावलेल्या नोकऱया टिकविण्यासाठी अर्थव्यवस्थेच्या तुलनेत 15 टक्क्यांचा मदतनिधी दिला आहे. परंतु हा मदतनिधी अनेक टप्प्यांमध्ये देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आगामी वर्षात अर्थसंकल्पीय तुटीचे आकलन करण्याची गरज आहे. त्वरित खर्चात कपात करता येईल हे विश्वासाने सांगू शकत नाही. हे एक खबरदारीपूर्ण पाऊल असायला हवे. ज्या वेगाने अर्थव्यवस्था वाढत आहे, त्यात सातत्य असावे असे विधान सीतारामन यांनी केले आहे.
मदतनिधी पूर्वीपासूनच आशियातील तिसऱया क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचे बळ वाढवत होता. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत विकासाचा आकडा आता उत्तम आहे. पहिल्या तिमाहीत विकासाचा दर 23.9 टक्क्यांनी खालावला होता. तर अनेक निर्देशांकांद्वारे आता सेवा आणि निर्मिती क्षेत्रांच्या स्थितीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले आहे. हेच क्षेत्र अर्थव्यवस्थेचे प्रमुख इंजिन असल्याचे सीतारामन म्हणाल्या.
आरबीआयच्या दृष्टीकोनात बदल
भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेसाठी स्वतःच्या वार्षिक दृष्टीकोनात (ऍन्युअल आउटलुक) बदल केला आहे. या बदलामुळे ऑक्टोबरमध्ये 9.5 टक्के घसरणीच्या अनुमानाच्या तुलनेत दुसऱया तिमाहीत 7.5 टक्क्यांची घसरण नोंदली गेली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आरबीआय अत्यंत स्पष्टपणे आर्थिक रिकव्हरी पाहत आहेत. नव्या वर्षात चांगली, निरंतर आणि सकारात्मक रिकव्हरी होणार असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे.