चर्चेविना अर्थसंकल्प संमत करण्याचा होता ठराव
प्रतिनिधी/ पणजी
अर्थसंकल्पावर चर्चा न करता तो संमत करण्यासाठी नियमच रद्द करण्याच्या कृतीला विरोधी आमदारांनी आक्षेप घेतला असतानाही ती कृती केल्याच्या निषेधार्थ त्यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्या समोर जाऊन निदर्शने केली. यावेळी विधानसभागृहात मोठा गदारोळ झाला म्हणून सकाळच्या सत्रातील कामकाज संपता संपता सभापतींनी ते दुपारी 2.30 वा. पर्यंत तहकूब केले. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तसे ठरवण्यात आल्याचा दावा सभापती, विधासभा कामकाजमंत्री माविन गुदिन्हो व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला तथापि विरोधी आमदारांनी तो फेटाळून लावला.
गुदिन्हो यांनी अर्थसंकल्पावर चर्चा न करताच मान्य करण्याचा ठराव विधानसभेत मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर, रोहन खंवटे यांनी त्यास आक्षेप घेतला. ढवळीकर यांनी तर मागण्यांवरील चर्चाही रद्द करा, असे सुचविले. खरे म्हणजे अर्थसंकल्पावर चर्चा करून त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचे असते, असे ढवळीकर यांनी निदर्शनास आणले. चर्चा टाळण्यासाठीच सरकारचा हा कुटील डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
गुदिन्होंचा ठराव संमत
सभापतींनी गुदिन्होंचा ठराव मतदानास टाकला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर झाल्याचे नमूद केले. प्रत्यक्षात त्यावेळी कोणाचाच आवाज आला नाही. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी या प्रकरणी खंत प्रकट केली आणि हे काय चालले आहे ? अशी विचारणा केली. सभापतींनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चेविना अर्थसंकल्प संमत करण्याचा निर्णय झाल्याचे विधानभेत सांगितले.
सभापतींच्या स्पष्टीकरणाला विरोध
सभापतींच्या स्पष्टीकरणाला विरोधी आमदारांनी जोरदार आक्षेप घेऊन विरोध दर्शवला आणि कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तसा निर्णय झालाच नसल्याचे नमूद केले. त्याचा निषेध करण्यासाठी प्रथम सरदेसाईंनी आसन सोडले व ते सभापतींसमोर गेले. त्या पाठोपाठ इतर विरोधी आमदारांनी आवाज काढला. तेही पुढे गेले. तेव्हा सभापतींनी कामकाज तहकूब केले.