जिल्हा परिषदेचे 40.99 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर,
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा परिषदेचे 2020-21 साठी अपेक्षित जमा 45 कोटी विचारात घेऊन 44.99 कोटी खर्चाचा अर्थसंकल्प केला होता. कोरोनामुळे शासनाकडून अपेक्षित अनुदान जमा न झाल्याने 2019-20 च्या शिल्लक रक्कम 46 कोटी मधून खर्च करण्यात येत आहे. एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 अखेर प्राप्त झालेली रक्कम विचारात घेऊन 2020-21 चे अंतिम सुधारित बजेट तयार केले असून 40 कोटी 99 लाख रुपयांच्या महसूली खर्चाचे अंदाजपत्रक सर्व विभागाचा समतोल साधून जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी सभागृहात मांडले. त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कुबले यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला बालकल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना खाडे आदी उपस्थित होते.
मानसिंगराव जगदाळे यांनी सादर केलेले बजेट पुढील प्रमाणे, जिल्हा परिषदेच्या स्वनिधीचे 2020-21 चे अंतिम सुधारित व सन 2021-22 चे मूळ अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. ते 41 कोटी इतके ग्रहीत धरुन प्रस्तावित केले आहे. 1 लाख एवढय़ा शिल्लकेचे सादर केले आहे. त्यात सामान्य प्रशासनाला 2 कोटी 37 लाखाची, शिक्षण विभागासाठी 2 कोटी 5 लाखाची तरतूद, बांधकाम विभागासाठी 11 कोटी 20 लाखाची तरतूद, लघुपाटबंधारेसाठी 1 कोटी 10 लाखाची तरतूद, आरोग्य विभागासाठी 10 कोटी, आर्युवेदीक गार्डनसाठी 20 लाखाची, कृषी विभागासाठी 2 कोटी 25 लाखाची तरतूद, पशुसंवर्धनसाठी 1 कोटी, समाजकल्याणसाठी 1 कोटी 98 लाखाची तरतूद, संकीर्ण 12 कोटी 18 लाख, महिला बालकल्याणसाठी 91 लाख, एकात्मिक बाल विकाससाठी 11 लाख 75 हजार, ग्रामीण पाणी पुरवठय़ासाठी 1 कोटी 20 लाख, जिल्हा परिषद मुद्राणालयासाठी 3 कोटी 60 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. या बजेटला सर्वानी अनुमती दिली आहे.
कृषी विभागाला जादा तरतूद करण्याची मागणी
कृषी विभागासाठी जादाची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी दीपक पवारांनी केली. सुरेंद्र गुदगे यांनी जिल्हा परिषद उत्पन्नासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना मांडत घाबरत मांडलेले बजेट आहे, अशी टीप्पणी केली. वसंतराव मानकुमरे यांनी वायफळ खर्च थांबवा अन् सेस फंडाकडे निधी वळवा, अशी मागणी केली. वनिता गोरे यांनी महिला दिनाला स्वतंत्र हेड करावा, अशी मागणी केली.