31 पर्यंत चालणार- 8 रोजी येडियुराप्पा मांडणार अर्थसंकल्प
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरुवार दि. 4 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. कोरोना परिस्थितीमुळे यंदा अर्थसंकल्पात भरघोस योजनांच्या तरतुदी नसल्या तरी जनतेतून मोठय़ा अपेक्षा आहेत. अर्थखात्याची जबाबदारी सांभाळणारे मुख्यमंत्री येडियुराप्पा सोमवार दि. 8 मार्च रोजी 2021-22 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प मांडणार आहेत. अधिवेशनाचे पहिले दोन दिवस ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावर चर्चा होणार आहे.
4 मार्च ते 31 मार्च या कालावधीत विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. इंधन दरवाढ, विविध समुदायांना आरक्षण, चिक्कबळ्ळापूर-शिमोगा जिल्हय़ातील जिलेटिन कांडय़ांचा स्फोट, ग्रामीण पाणी पुरवठय़ाची समस्या, चारा टंचाई यासह विविध मुद्दय़ावरून सत्ताधारी भाजपची कोंडी करण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळे या अधिवेशनातही सत्ताधारी-विरोधी पक्षांमध्ये जुगलबंदी दिसून येण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पावरील चर्चेबरोबरच अनेक प्रमुख विधेयके देखील दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्यात येणार आहेत. प्रश्नोत्तर चर्चा, लक्षवेधी सूचना, नियम 69 अंतर्गत चर्चाही होणार आहे. कोरोना परिस्थितीमुळ विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये आरोग्यविषयक सुरक्षा उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
सभापतींची सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा
गुरुवारपासून बेंगळूरमध्ये सुरू होणारे विधिमंडळ अधिवेशन सुरळीतपणे पार पडावे, यासंबंधी विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनी बुधवारी सभागृहात सदस्यांचे वर्तन कसे असावे?, कोणत्या पद्धतीने सदस्यांनी कामकाजात सहभागी व्हावे?, यासह अनेक मुद्दय़ांवर विरोधी पक्षनेते, सभागृहातील सत्ताधारी नेते, मुख्य प्रतोद यांच्याशी चर्चा केली. डिसेंबर 2020 मध्ये विधानपरिषेद घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची प्रत्येक पक्षाच्या सदस्याने खबरदारी घ्यावी, अशी सूचना देखील होरट्टी यांनी तिन्ही पक्षातील नेत्यांना दिली आहे.
विधानपरिषदेत मोबाईलवर निर्बंध
सभागृहातील कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी विधानपरिषद सभागृहांमध्ये सर्व सदस्यांना मोबाईल वापरावर पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांनीच सभागृहात हजर राहून प्रश्नांना उत्तरे द्यावीत. प्रश्नोत्तर चर्चा 75 मिनिटांत संपवावी. दिवसभरातील कामकाजाच्या अजेंडय़ामध्ये असणाऱया विषयांवर त्याच दिवशी चर्चा पूर्ण करावी. शून्य प्रहर वेळेत विचारलेल्या प्रश्नांना सरकारने दोन दिवसांत उत्तरे द्यावीत, अशा सूचनाही सभापती बसवराज होरट्टी यांनी दिल्या आहेत.