प्रतिनिधी / रत्नागिरी
केंद्रीय अर्थसंकल्प येऊ घातला असून त्यामध्ये कोकणासाठी काय मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण यासह अनेक मुद्यांवर केंद्र सरकारच्या पाठिंब्याच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. काजूसारखे नगदी पिक अधिक दर मिळवून देईल, अशी अपेक्षा शेतकऱयांना वाटत आहे तर आंबा निर्यातीसाठी विशेष योजना अपेक्षित आहेत.
शनिवारी लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर होण्याची योजना करण्यात आली आहे. संरक्षण खात्यापासून ग्रामीण विकास यंत्रणेपर्यंत सर्वच खात्यांना किती प्रमाणात आर्थिक तरतूद केली, हे अर्थसंकल्पात सांगितले जाईल. वेगवेगळ्या प्रकारच्या करांचे दरही निश्चित केले जातील. याशिवाय आगामी आर्थिक वर्षात सवलती देण्याविषयीचे धोरणही स्पष्ट होईल. कोकणात विकासाच्या टप्प्यावर अनेक अपेक्षा व्यक्त होत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम बऱयापैकी मार्गी लागले आहे. निधीअभावी काही ठिकाणी ते काम रेंगाळल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थसंकल्पात भरघोस निधी या कामासाठी उपलब्ध होईल व उशिर झालेला महामार्ग लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.
कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण ही दोन कामे सध्या मार्गस्थ झाली आहेत. दुपदरीकरणासाठी आवश्यक निधीची उभारणी अद्याप झालेली नाही. केंद्र सरकार या अर्थसंकल्पात त्यासाठी चांगला निधी देईल, अशी अपेक्षा आहे. विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर असून येत्या काही महिन्यात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. अखेरच्या टप्प्यातील निधी त्यासाठी मिळेल, असे अपेक्षित आहे.
काजू आयातदारांना सिमाशुल्क वाढवले जाणार का, अशी भीती वाटत आहे. पण देशी काजू उद्येागाला परिपूर्ण संरक्षण देणारी धोरणे अर्थमंत्री निर्मला सितारमण या मांडतील, अशी अपेक्षा आहे. मत्स्य उत्पादनासाठी निलक्रांती योजनेसाठी पुरेसा निधी मिळेल व निर्यातीसाठी अधिक व्यापक धोरण स्वीकारले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आंबा व काजू निर्यातीच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचे जाळे उभे करण्यासाठी देशभरात योजना आखली जात आहे. त्याला अर्थमंत्र्यांकडून कितपत महत्व दिले जाणार, हे ही आजच्या अर्थसंकल्पात स्पष्ट होईल.