सेवा बजावताना काळजी घेण्याचा दिला सल्ला
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य राखीव दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार यांनी मंगळवारी बेळगावला भेट दिली. आपल्या या बेळगाव भेटीत त्यांनी कोरोना बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या आरोग्याची विचारपूस केली. सेवा बजावताना काळजी घेण्याचा सल्ला दिला.
कोरोना महामारी विरुद्धच्या लढय़ात पोलीस दलाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशभरातील पोलिसांच्या सेवेचे कौतुक केले होते. रस्त्यावरच्या लढाईत पोलीस दिवसरात्र सतर्क आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोना हॉटस्पॉटमध्ये काम करणाऱया पोलिसांना प्रत्य़क्ष भेटून त्यांची विचारपूस करावी व काळजी घेण्याचा सल्ला देत त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आपण राज्यातील वेगवेगळय़ा भागात भेट देत असून बुधवारी मुधोळ, जमखंडी, विजापूरला जाणार असल्याचे अलोककुमार यांनी पत्रकारांना सांगितले.
राणी चन्नम्मा चौक परिसरात बंदोबस्तावर असलेल्या राखीव दलाच्या पोलिसांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या विचारपूस केली. कोरोनाविरुद्ध लढताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, स्वच्छतेवर भर द्या, स्वतःचे आरोग्य सांभाळून बंदोबस्ताचे कर्तव्य पार पाडा, असा सल्ला अलोककुमार यांनी दिला.
लग्न करण्याचा सल्ला
प्रत्येक पोलिसांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करताना अलोककुमार यांनी एका पोलिसाला लग्नाचा सल्ला दिला. त्यावेळी हास्या पिकल्या. तुमचे कुटुंबीय कुठे असते? अशी विचारणा केल्य़ानंतर माझे सर्व कुटुंबीय गावाकडे आहे. मी एकटाच येथे आहे, असे उत्तर राखीव दलाच्या पोलिसाने दिले. कुटुंबीयांना गावाकडे ठेवून तुम्ही एकटेच येथे काय करता असे विचारताच सर माझे अजून लग्न झाले नाही असे पोलिसाने सांगितले. नोकरी लागून सहा वर्षे झाली अजून लग्न का केला नाहीस? अशी विचारणा करुन लवकर लग्न कर असा सल्ला अलोककुमार यांनी दिला.