शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचे प्रमोद जठारांना प्रत्युत्तर
वार्ताहर / देवगड:
मागील पाच वर्षात भाजपचे मुख्यमंत्री असताना नाणार प्रकल्प रद्द झाला तरीही पुन्हा-पुन्हा कोकणी लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भू-माफिया दलाल प्रमोद जठार यांनी बंद करावेत. अल्टिमेट देण्याची भाषा महाराष्ट्र सरकारला न करता मोदी सरकारला दिल्लीत जाऊन करावी, अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
साळसकर यांनी म्हटले आहे, जठारांची फसवेगिरी जनता ओळखून आहे. जठारांनी शिवसेना खासदार, आमदारांची चिंता करू नये. विधानसभा निवडणुकीत राणे कंपनीकडून त्यांनी केलेली दलाली संपली का? ज्या गावांना नाणार प्रकल्प नको, त्या गावांना वगळून हा प्रकल्प करावा, असे जठारांनी म्हटले होते. पण, जठारांनी त्यांची व त्यांच्या हितचिंतक दलालांची जमीन कुठल्या गावात आहे, हे त्यांनी जाहीर करावे. युवा पिढीची त्यांना चिंता असती तर मागील लॉकडाऊनच्या काळात एकटय़ा देवगड तालुक्मयात इतर राज्यातील तीन ते साडेतीन हजार मजूर नोकरी करत होते. त्यांचे काय? त्यावेळी कोकणातील युवा पिढी कुठे गेली याचा शोध त्यांनी घेतला का? ठाकरे यांना निवेदन देत अल्टिमेट देण्यापेक्षा बाजूच्या गोवा राज्यात त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील युवा पिढीची एवढीच चिंता असेल, तर नाणार प्रकल्प गोवा राज्यात घेऊन जा. सिंधुदुर्गमधील युवक तेथे येऊन नोकरी करतील. युवकांना रोजगार देणे म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नव्हे, असा टोलाही साळसकर यांनी लगावला आहे.