प्रतिनिधी/ पणजी
राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे शनिवार दि. 21 नोव्हेंबर पासून राज्यातील दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या अत्यल्प प्रतिसादात वर्ग भरविण्यात आले.
सरकारी निर्देशानुसार सर्व शाळा प्रमुखांनी पूर्व तयारी केली होती. वर्गांची स्वच्छता, सेनिटायझेशन, व अन्य साफसफाई करण्यात आली होती. ठरल्यानुसार शनिवारी सकाळी विद्यार्थी शाळेत दाखल झाले. मात्र त्यांची संख्या अल्पच होती. बालरथ किंवा कदंबच्या बसेसची व्यवस्था नसल्यामुळे बहुतेक पालकच आपल्या मुलांना घेऊन शाळेत आले होते. व ते शाळा सुटेपर्यंत बाहेर थांबले होते.
विद्यार्थी शाळेत पोहोचले तेव्हा सर्वप्रथम त्यांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात आली. सेनिटायझर लावून त्यांना प्रवेश देण्यात आला. तसेच वर्गातही सुरक्षित अंतर ठेऊन विद्यार्थ्यांना बसविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व विद्यार्थी मास्क परिधान करून आले होते.
सरकारी निर्देशानुसार प्रत्येक वर्गात केवळ 12 विद्यार्थी बसविण्यास अनुमती देण्यात आली होती. तसेच सर्व विद्यार्थ्यांना एकाच दिवशी न बोलवता मर्यादित संख्येने एक, दोन, तीन दिवसांआड बोलविण्याची सूचना करण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या दिवशी मुलांची उपस्थिती काही ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी बरीच कमी दिसून आली.
दरम्यान, काही पालकांनी मात्र आपल्या पाल्यांना पुढील आठवडय़ातच शाळेत पाठविणार असे ठरविल्यामुळे बरेच विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत पोहोचले नाहीत.