कुंडल / वार्ताहर
अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे आणि द्राक्ष बागांचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शासनाला माहिती पाठवावी, त्याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन आमदार अरुण अण्णा लाड यांनी दिले.
आमदार लाड यांनी तालुक्यातील गोंदीलवाडी, शिवाजीनगर, इनामपट्टा, कृषिनगर भागात गेली चार दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची आणि इतर पिकांची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आश्वास्थ केले. कसलीही परिस्थिती आली तरी क्रांती उद्योग समूह आपल्या सदैव पाठीशी असेल असा आधारही दिला.
द्राक्ष पीकाला लाखो रुपये खर्चून दर्जेदार पीक आणण्यासाठी शेतकरी अहोरात्र कष्ट करत असतो, त्याने पिकवलेल्या बागांना विम्याचे संरक्षण मिळावे म्हणून पीक विमा आहे पण पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक शंका होत्या त्या त्यांनी ऐकून घेऊन, द्राक्ष बागांसाठी पूर्ण बागेचे नुकसान झाल्यावर विमा भरपाई मिळते पण शेतकऱ्यांनी मागणी केली की, कोणत्याही स्टेजला बागेचे नुकसान झाले तरी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच सद्या 80 टक्के शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पीक विमा उतरण्याची पद्धत सोपी करावी यासाठीही प्रयत्न करणेच आश्वासन त्यांनी यावेळी दिले.