शहरातील व्यावसायिकांची उडाली तारांबळ : विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त
प्रतिनिधी / बेळगाव
शहरासह उपनगरे व ग्रामीण भागामध्ये गुरुवारी अचानकपणे अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली. यामुळे शेतकऱयांची हातातोंडाला आलेली पिके वाया गेली. या पावसामुळे शहरातील व्यापाऱयांचीही तारांबळ उडाली.
दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाचे दमदार आगमन झाले. पाऊस येईल असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र, अचानकपणे हा पाऊस आला. त्यामुळे शेतकऱयांनी काढून ठेवलेली कडधान्य पिके भिजून गेली. या अवकाळी पावसाने बळीराजा हतबल झाला आहे.
दुपारी सुरू झालेल्या या पावसामुळे शहरातील फेरीवाले, बैठे व्यापारी व भाजी विपेत्यांचीही तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी काहीच नसल्यामुळे भाजीपाला व फळे भिजून गेली. व्यापाऱयांनाही भर पावसातच थांबावे लागले. या अवकाळी पावसामुळे दुचाकीस्वार व पादचाऱयांनाही त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर वाहने पार्किंग करून त्यांना आडोसा शोधावा लागला. दोन टप्प्यामध्ये हा पाऊस झाला. काही ठिकाणी कचरा अडकून गटारीतील पाणी रस्त्यावर वाहत होते. याचबरोबर हवेमध्ये काही वेळ कमालीचा गारवाही निर्माण झाला होता.