हजारो कोटीचे नुकसान ! द्राक्षघडकुजीचा निर्यातक्षम मालास फटका !
मणेराजूरी / प्रतिनिधी
मणेराजूरीसह तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या दहा ते बारा दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी; वादळी पावसाने द्राक्षबागा संकटात आल्या आहेत; त्यातच फुलोरा स्टेजमधल्या द्राक्षबागांचे साठ ते सत्तर टक्के द्राक्षघड कुजन नुसते दांडेच राहिले आहेत ;यामुळे बागायतदार हवालदिल झाले असून चालू वर्षी द्राक्षांचे उत्पनही घटण्याची भिती आहे त्यामुळे या विभागाचे अर्थकारण ही कोलमडणार आहे.
मणेराजूरीसह तासगांव तालुक्याच्या पूर्व भागात सावळज, गव्हाण, सावर्डे, उपळावी, डोंगरसोनी, कुमठे, योगेवाडी आदी परिसरात द्राक्षबागांचे हजारो हेक्टर क्षेत्रावर पीक घेतले जाते. मोठ्या कष्टाने बागा पिकविल्या जातात परंतु चालू वर्षी जूलैपासूनच पावसाने सुरुवात केल्याने बागायतदारांनी सप्टेंबरमध्ये फळ छाटण्या न घेता उशिरा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये बागांच्या फळछाटणी घेणेस सुरुवात केली होती. या परिसरातील छाटण्याही पूर्ण झाल्या असुन काहीबागांच्या सप्टेंबरमध्येही छाटण्या झाल्या आहेत. अवकाळी पावसाने निर्यातक्षम द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. घडकुज, मणीगळ, दावण्या आणि करपा रोगाने द्राक्षबागा उध्वस्त होत आहेत. पावसाने थोडी जरी उसंत दिली, तरी औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र औषधांच्या वाढलेल्या किंमती व मजूरीचे वाढलेले दर यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारणाचे कंबरडे मोडले आहे.
गतवर्षी खराब हवामानाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी जरा उशीरा छाटणी केली. पण यंदाही निसर्गाच्या लहरीपणामुळे उशिरा फळ छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांनाच याचा मोठा फटका बसला आहे. ढगाळ वातावरणा आणि अवकाळी पावसाने छाटणी होऊन ३२ ते ५२ दिवस झालेल्या बागांची द्राक्षघडांची कुज, मणीगळ सुरू आहे. अनेक बागात दावण्या आणि करपा रोगाने थैमान घातले आहे. निर्यातक्षम व विक्रीसाठी तयार करणेत आलेल्या बागाचे सत्तर टक्के नुकसान झाले आहे. राहिलेली बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असुन महागड्या औषधांची फवारणी सुरु आहे. वातावरणाचा लहरीपणा असाच डिसेंबरपर्यंत राहणार असल्याच्या अंदाजाने बागायतदारांचा जीव घायकुतीला आला आहे .
सध्या ऑक्टोबरमध्ये फळछाटणी केलेल्या बागा फुलोरा स्टेजच्या टप्प्यात आहेत. परंतु गेल्या दहा ते बारा दिवसापासून या परिसराला अवकाळी वादळी पावसाने झोडपून काढले आहे त्यामुळे बागेमध्येच औषधे फवारणीचे ट्रॅक्टर अडकले आहेत औषधे फवारणीला उघडीपच नसल्याने संकटात वाढच होत आहे. घडकुजीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्षबागांचा शासकीय पंचनामा करून मोठी मदत दिली तरच येथील बागायतदार जगेल,अशी शेतकऱ्यांची मागणी या परिसरातून होत आहे.