पश्चिम भागात झाला पाऊस, सुगीच्या हंगामात व्यत्यय
वार्ताहर/ किणये
तालुक्याच्या पश्चिम भागाला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गुरुवारी दुपारी या भागात दमदार पाऊस झाला आहे. सध्या सुगी हंगामाची कामे जोमाने सुरु आहेत. मात्र अवकाळी पावसामुळे या कामामध्ये व्यत्यय निर्माण झाला आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
बुधवारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकऱयांमध्ये चिंता पसरली होती. गुरुवारी सकाळपासूनच घडत वातावरण निर्माण झाले होते. अन दुपारी या अवकाळी पाऊस बरसण्यास प्रारंभ झाला. सुमारे तासभरहून अधिक या परिसरात पाऊस झाल्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. बहुतांशी परिसरातील मळणी हंगाम जोरात चालु होता. मात्र पाऊस आल्यामुळे शेतकऱयांची तारांबळ उडाली होती. अनेक शेतकऱयांना आपल्या मळण्या अर्ध्यावर सोडूनच घरी परतावे लागले.
मळण्या सुरु असतानाच पाऊस आल्यामुळे भात भिजले तसेच पिंजर ही भिजल्यामुळे चाऱयाचे नुकसान झाले आहे. मळणीत भातावर तसेच पिंजरावर ताडपत्री घालण्यासाठी शेतकऱयांची धावपळ दिसून आली. अचानक झालेल्या पावसामुळे बेळगावला व बाहेर कामानिमित्त गेलेल्या नागरिकांना मात्र संध्याकाळी घरी येताना पावसात भिजूनच घरी यावे लागले. हा पाऊस तालुक्याच्या पश्चिम भागातील किणये, बहाद्दरवाडी, नावगे, संतीबस्तवाड, वाघवडे, झाड शहापूर, देसूर, बेळगुंदी, कावळेवाडी, बिजगर्णी, बेळवट्टी, राकसकोप आदी परिसरात झाला.