सोमवारपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात : सोशल डिस्टन्सिंग नियमांचे झाले पालन, शहरातील रस्ते दहानंतर झाले निर्मनुष्य पोलिसांनी अनेक वाहने केली जप्त,
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारने सोमवारपासून कडक लॉकडाऊन होणार असे जाहीर केल्यानंतर शनिवार आणि रविवारी बेळगावमध्ये नागरिकांनी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली. ही गर्दी पाहून प्रशासनानेसुद्धा डोक्मयाला हात लावला होता. मात्र, सोमवारपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि शहरातील रस्ते दहानंतर निर्मनुष्य झाले.
या कालावधीत बँका, काही किराणा दुकाने, दूध, औषधे, आरोग्यसेवा, माध्यम सेवा, कृषी आणि दुग्धोत्पादन, स्थानिक कामगार असणारेच औद्योगिक कारखाने, रेल्वे व विमानप्रवास या सेवा सुरू ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. बाकी सर्व सेवांवर सरकारने निर्बंध आणले आहेत. मुख्य म्हणजे सकाळी 6 ते 10 वेळी कोणत्याही खरेदीसाठी बाहेर पडणाऱयांना वाहनांविना जाऊन खरेदी उरकावी लागेल, हे प्रशासनाने स्पष्ट केले होते. तरीसुद्धा काही हौशी महाभागांनी आपली वाहने बाहेर काढली आणि त्यांना प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. शहरातील बऱयाच भागांमध्ये वाहनांवरून ये-जा करणाऱयांची वाहने पोलिसांनी जप्त केली.
दरम्यान, 10 नंतर मात्र शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले. ‘तरुण भारत’ टीमने शहराचा फेरफटका मारला असता मच्छे-पिरनवाडीपासून कंग्राळीपर्यंत रस्ते निर्मनुष्य झालेले दिसून आले. या दरम्यान, सिलिंडर डिलिव्हरी सुरू होती.
शिवाय कचरावाहू वाहनांची संख्या मात्र अधिक दिसून आली. हेस्कॉमचे कर्मचारीसुद्धा ठिकठिकाणी नागरिकांच्या तक्रारीनुसार तेथे जाऊन दुरुस्ती करत होते.
रस्त्यांवर शुकशुकाट
चन्नम्मा सर्कल, नेहरूनगर, आझमनगर, शाहूनगर, कुमारस्वामी ले-आऊट, टीव्ही सेंटर, हनुमाननगर, सदाशिवनगर येथील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. तुलनेने क्लब रोडवर मात्र काही अंशी वाहतूक आणि वर्दळ सुरू होती. अशीच वर्दळ टीजेएसबी बँकेजवळ दिसून आली. मात्र, या ठिकाणी पोलीस आयुक्त डॉ. विक्रम आमटे स्वतः उभे होते. येणाऱया-जाणाऱया प्रत्येक वाहनचालकाची त्यांनी कसून चौकशी केली. ज्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्र आहे आणि ज्यांची सेवा अत्यावश्यक गटात मोडते अशांना त्यांनी जाऊ दिले.
पेट्रोल पंपावर तुरळक गर्दी
पेट्रोल पंपावर दररोजच्या तुलनेत तुरळक गर्दी होती. वाहनचालकांची संख्या नगण्य असल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱयांना बराचसा निवांतपणा मिळाला. दरम्यान, आमच्याकडे ओळखपत्र असून सकाळी 6 ते 2 या वेळेत आपण पंपावर येत आहोत. कोणीही आम्हाला अडविले नाही, असे आझमनगर येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱया रुपा पाटील या कर्मचारी महिलेने सांगितले. तसेच टीव्ही सेंटर येथे भेटलेले हेस्कॉमच्या दोन कर्मचाऱयांनी आपण कोरोना काळात सदैव कार्यरत आहोत, असे सांगितले.
‘आम्हाला काम करणे भाग आहे. दोन शिफ्टमध्ये आम्ही काम करतो. आमचे काही सहकारी पॉझिटिव्ह असल्याने आम्हाला त्यांचेही काम करावे लागते. रहिवाशांच्या तक्रारी आल्यानंतर तेथे जातो अन्यथा शहरातील सार्वजनिक पथदीप आणि अन्य समस्यांची सोडवणूक आम्ही करतो’, असे बसवराज सासनूर यांनी सांगितले. हेस्कॉमने आपल्याला मास्क, ग्लोव्हज् व फेसशिल्डसुद्धा दिल्याचे समर्थ शिगीहळ्ळी यांनी सांगितले.
140 वाहने जप्त, 230 विनामास्क गुन्हे दाखल : पहिल्याच दिवशी पोलिसांची धडक कारवाई, अनेकांना लाठीचा प्रसाद
लॉकडाऊन काळात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. केवळ पायी चालत येवून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करायची आहे. तसेच नागरिकांनी विनाकारण बाहेर पडायचे नाही, असे नियम लागू करण्यात आले. तरी देखील काही जण आततायीपणा करत वाहने घेवूनच घराबाहेर पडले होते. त्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. पहिल्याच दिवशी 140 वाहने जप्त केली आहेत. तर विनामास्क फिरणाऱया 230 जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
कठोर नियमांची अंमलबजावणी
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. क्लोजडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करण्यात आले. बाजारात प्रचंड गर्दी करण्यात येत होती. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामध्ये कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
शहरासह ग्रामीण भागातही पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, नियमांचे उल्लंघन केल्यास चांगलाच हिसका दाखविण्यात येईल. जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. कारण कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही साऱयांच्याच दृष्टिने धोकादायक आहे. तेव्हा नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.