दिवाळीच्या चैतन्यमयी पर्वास प्रारंभ : लक्ष्मीपूजन उत्साहात
प्रतिनिधी /बेळगाव
दिवाळीच्या उत्साही, चैतन्यमयी पर्वास प्रारंभ झाला असून सोमवारी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले. गल्लोगल्ली रेखाटण्यात आलेल्या रंगीबेरंगी लक्षवेधी रांगोळय़ा, घरासमोर आणि गल्लोगल्ली टांगलेले अनेक नमुन्यांचे कलात्मकता दर्शविणारे आकाशकंदील, त्यातून लुकलुकणारा प्रकाश, सोबतीला पणत्यांचा स्निग्ध प्रकाश यामुळे ‘लखलखती चंदेरी दुनिया’च बेळगावकरांनी अनुभवली.
वसुबारसपासून दिवाळीच्या पर्वाला प्रारंभ झाला. परंतु या पर्वातील मुख्य दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध करून विजय मिळविलेला हा दिवस. आपण तिन्ही लोकी राज्य करावे, या महत्त्वाकांक्षेने नरकासुराने यज्ञ करून त्यासाठी 16 हजार कुमारिकांना आपल्या कैदेत ठेवले होते. श्रीकृष्णाने त्याचा वध करून या कुमारिकांना मुक्त केले. तो हा दिवस होय. परंपरेप्रमाणे नरकचतुर्दशी दिवशी पहाटे अभ्यंगस्नान झाले.
यावेळी पायाखाली कारीट चिरडण्यात आले. हे कारीट म्हणजेच नरकासुराचे प्रतीक असे समजले जाते. श्रीकृष्णाचा विजय साजरा करण्यासाठी त्याकाळी मशाली पेटवून प्रकाशाने परिसर उजळण्यात आला. आता पणत्या आणि आकाशदिवे तसेच विद्युतरोषणाईने परिसर उजळण्यात येतो.
अर्थातच महिलांनी पहाटे घरासमोर शुभ चिन्ह दर्शविणारी रांगोळी रेखाटली. तर रस्त्यावरही मोठमोठय़ा रांगोळय़ा रेखाटण्यात आल्या होत्या. या रांगोळय़ा म्हणजे महिलांच्या हस्तकलेचा आविष्कारच घडविणारा ठरला. अभ्यंगस्नानानंतर बच्चेकंपनीचे औक्षण करण्यात आले आणि फराळाचा आस्वाद घेऊन मंडळी परस्परांना शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर पडली. काही ठिकाणी खरेदीसुद्धा सुरू होती. बुधवारी असलेल्या पाडवा आणि भाऊबिजेची खरेदी प्रामुख्याने सोमवारी पार पडली.
दोन वर्षांच्या खंडानंतर सार्वजनिक स्वरुपात दिवाळीचे स्वागत करताना बेळगावकरांनी कोणतीही कसर सोडली नाही. लहान असो अथवा मोठे असो प्रत्येक दुकान विद्युतरोषणाईने उजळले होते. कार्यालये, बँका या ठिकाणीसुद्धा आकाशदिवे टांगलेले पहायला मिळाले. याचबरोबरीने सोशल मीडियावर दिवाळीच्या शुभेच्छांची अखंड देवाण-घेवाण सुरू होती.