आयुष्यभर केलेल्या कष्टाची कमाई चोरी होऊन काही क्षणांमध्ये नाहीशी झाली तर माणूस खचून जाणार, निराश होणार हे तर खरेच आहे. पण काही निश्चयी व्यक्ती याही परिस्थितीतून मार्ग काढून आपले गमावलेले विश्व पुन्हा निर्माण करतात, आणि जगाच्या आदराला पात्र आणि प्राप्त होतात. परिस्थितीसमोर हारणे हे त्यांच्या रक्तात नसतेच. तामिळनाडूच्या इलावरसी जयकांत या महिलेने हे शब्दशः खरे करून दाखविले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव राज्यभर गाजत आहे.
त्या व त्यांचा परिवार 45 वर्षांपासून थ्रिसूर येथे वास्तव्यास आहे. विविध प्रकारच्या मिठाया व खाण्याचे पदार्थ बनवून विकणे हा त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय. 20 वर्षांपूर्वी 50 लाख रूपयांचे कर्ज काढून त्यांनी व्यवसाय वाढविला. मात्र, 2011 मध्ये एका चोरीच्या घटनेने त्यांचे सर्वस्व लुटले गेले. त्यानंतर त्यांनी अवघ्या 100 रूपयांच्या भांडवलातून विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यास प्रारंभ केला. अस्वती हॉट चिप्स असे व्यवसायाचे नामकरण केले. अवघ्या 9 वर्षांच्या कालखंडात त्यांनी इतकी प्रगती केली की आज थ्रिसूर सारख्या शहरात त्यांचे चार आऊटलेट्स् आहेत. त्यांना व्यावसायिक प्रगतीसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. प्रयत्न आणि निर्धार यांच्या आधारावर गतवैभव पुन्हा प्राप्त झाले.