कॅम्प येथे वाहतूक सुरूच : रहदारी खात्याची मोहीम म्हणजे ‘नव्याचे नऊ दिवस’ : प्रशासनाची कारवाई केवळ दिखाऊपणाची
प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प येथे अवजड वाहनाच्या अपघातात शाळकरी मुलाचा बळी गेल्यानंतर अवजड वाहनांवर बंदी घालून रहदारी पोलीस नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी केवळ मोजकेच दिवस करण्यात आली. त्यानंतर या रस्त्यावर पुन्हा अवजड वाहनांची वर्दळ सुरू झाली असून रहदारी पोलीस गायब झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाची कारवाई केवळ दिखाऊपणाची असल्याचा आरोप होत आहे.
राणी चन्नम्मा चौक ते गोगटे चौकपर्यंतच्या रस्त्याशेजारी विविध शाळा, महाविद्यालये आहेत. कॉलेज रोड आणि खानापूर रोड हा महत्त्वाचा असल्याने अवजड वाहनांची वर्दळ नेहमी असते. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत या रस्त्याचे काँक्रिटीकरण केल्यानंतर अवजड वाहनांच्या वेग मर्यादेवर नियंत्रण राहिले नाही. भरधाव वेगाने वाहने चालविण्यात येत असल्याचे नेहमीच निदर्शनास येते. विशेषतः ग्लोब थिएटर ते राणी चन्नम्मा चौकपर्यंतच्या रस्त्याशेजारी दुतर्फा शाळा असल्याने विद्यार्थी, विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणारे पालक, वर्दीच्या रिक्षा आणि स्कूल बसची गर्दी असते. अशातच अवजड वाहने ये-जा करीत असल्याने अपघात घडत आहेत.
सकाळी 8 ते 9.30 यादरम्यान शाळेला जाणाऱया विद्यार्थ्यांची घाई या रस्त्यावर असते. मात्र, याच दरम्यान या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत आहे. अलीकडेच कॅम्प परिसरात अवजड वाहनाच्या अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. यापूर्वीदेखील ग्लोब थिएटर परिसरात अनेक अपघात होऊन पालक आणि विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे. तरीदेखील प्रशासनाने कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत. कॅम्प येथे घडलेल्या घटनेनंतर सकाळी 11 पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय रहदारी पोलीस खात्याने घेतला होता. तसेच शाळेच्या परिसरात रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेऊन याची अंमलबजावणी करण्यात आली होती. शहरात येणारी सर्व अवजड वाहने उद्यमबाग परिसरात थांबविण्यात येत होती. मात्र, याची कार्यवाही केवळ मोजकेच दिवस करण्यात आली.
शाळा आणि मुख्य रस्त्यावर थांबणारे रहदारी पोलीसदेखील गायब झाले आहेत. ‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे प्रशासनाची ही कार्यवाही संपुष्टात आली आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर अवजड वाहने भरधाव वेगाने ये-जा करीत आहेत. विशेषतः कॅम्प परिसरात शाळांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. पण या परिसरातून अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या वाहनांची वर्दळ नेहमी असते. मिलिटरी महादेव आणि स्वतंत्रता मार्गावरून अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्याने या परिसरात असलेल्या शालेय विद्यार्थी आणि पालकांना धोका निर्माण झाला आहे.
बेनकनहळ्ळी येथील गोदामाला जाणाऱया वाहनांची वर्दळ
अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या बेनकनहळ्ळी येथील गोदामाला जाणाऱया वाहनांची वर्दळ सकाळच्या सत्रात जास्त असते. या रस्त्यावर बारा चाकी आणि सोळा चाकी वाहनांची ये-जा सुरू असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यावरून ये-जा करताना पालकांना कसरत करावी लागते. अशातच राक्षसरुपी असलेल्या अवजड वाहनांचा सामना पालकांना आणि विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱया रिक्षाचालकांना करावा लागत आहे. शहरातील रस्त्यांवरून ये-जा करण्यास सकाळच्या सत्रात अवजड वाहनांवर घातलेली बंदी धाब्यावर बसविण्यात आली आहे. तसेच रहदारी पोलीसदेखील गायब झाल्याने अवजड वाहनांची वर्दळ पुन्हा वाढली आहे.
कॅम्प परिसरात तीन ठिकाणी गतिरोधक घातले असले तरी विद्यार्थ्यांच्या जीवाचा धोका कमी झाला नाही. रस्ता ओलांडण्याच्या ठिकाणीच गतिरोधक घालण्यात आल्याने पादचाऱयांच्या मनामध्ये आणखी धास्ती वाढली आहे. ही वाहने भरधाव वेगाने येऊन गतिरोधकाजवळ थांबतात. काही वेळा वाहनचालकांना वाहनांवर नियंत्रण मिळविता येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्मयता अधिक आहे. केवळ काही दिवस अवजड वाहनांवर बंदी घालून रहदारी खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत असून याबाबत आंदोलन छेडण्याचा विचार चालविला आहे. या ठिकाणी घडणाऱया घटनेचे गांभीर्य प्रशासन व रहदारी खात्याला नसल्याचे निदर्शनास आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
‘स्टॉप’ फलक लाऊनही नॉनस्टॉप वाहतूक
कॅम्प येथे घडलेल्या घटनेनंतर केवळ आठ दिवस रहदारी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. या ठिकाणी गतिरोधक घालण्यात आले. पण परिस्थितीत कोणताच बदल झाला नाही. वाहनांची वर्दळ सुरूच असून रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना अडथळय़ांचा सामना करावा लागतो. विद्यार्थी रस्ता ओलांडत असल्याचे पाहूनही दुचाकी, चार चाकी, तीन चाकी आणि अवजड वाहनधारक आपली वाहने थोडय़ा वेळासाठी थांबवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवावरील धोका टळला नाही. पण केवळ प्रशासनाला दोष न देता आणि पूर्णपणे प्रशासनावर अवलंबून न राहता शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेसाठी परिसरातील व्यावसायिक आणि पालकांनी जबाबदारी घेतली आहे. या ठिकाणी रस्ता ओलांडताना एकही वाहन थांबत नसल्याने वाहनांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी आता फलकांचा वापर करण्यात येत आहे. या ठिकाणी ‘स्टॉप’ असे लिहिलेले चार फलक ठेवण्यात आले असून ज्यांना रस्ता ओलांडायचा आहे, त्यांनी हा फलक हातात घेऊन वाहनधारकांना दाखवत रस्ता ओलांडायचा आहे. असा पर्याय व्यावसायिकांनी तयार केला आहे. स्टॉप हा फलक दाखविला तरी काही वेळा वाहनचालक वाहने थांबवत नाहीत. त्यामुळे प्रत्येक वाहनचालकाने रस्ता ओलांडणाऱया शाळकरी मुलांचा विचार करणे गरजेचे आहे.
गतिरोधक असूनदेखील वाहनचालक भरधाव
रहदारी नियोजनासाठी पोलीस अधिकाऱयांची नियुक्ती केली होती. काही वेळा हे अधिकारी येऊन थांबतात. त्यांचे काय काम असते, कळत नाही. ते कधी-कधी या ठिकाणी फिरकतही नाहीत. पण पूर्णपणे पोलीस प्रशासनाला दोष देऊन चालत नाही. कारण वाहनचालकांचीदेखील थोडी जबाबदारी असते. पण एकही वाहनचालक आपली जबाबदारी ओळखत नाही. ज्या ठिकाणी गतिरोधक आहे, त्या ठिकाणी शाळा किंवा रहदारी आहे हे निश्चितच. पण गतिरोधक असूनही वाहनचालक भरधाव वाहने चालवित असतात. थोडीतरी बुद्धी वाहनचालकांना असणे गरजेचे आहे, अशी परखड प्रतिक्रिया अब्दुल गफार शेख यांनी व्यक्त केली. एका मुलाचा बळी गेला आहे, ही घटना आमच्या डोळय़ासमोरून हटत नाही. त्यामुळे ही वेळ पुन्हा येऊ नये, याकरिता आम्ही व्यावसायिक, रिक्षाचालक व पालकच रस्ता ओलांडण्यासाठी मुलांना मदत करीत असल्याचे शेख यांनी सांगितले.
– अब्दुल गफार शेख