प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विकासकामे राबविण्यात येत आहेत. पण बाजारपेठेंतर्गत निर्माण झालेल्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मठ गल्ली येथील गटारीमध्ये वाहने अडकण्यासह अवजड वाहनांमुळे इमारतीलाही धोका निर्माण झाला आहे. येथील समस्यांचे निवारण करण्याच्यादृष्टीने मनपाकडून आवश्यक उपाययोजना राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
मठ गल्लीचा परिसर बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागात येतो. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱया अवजड वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे.
मात्र ही वाहने रहिवाशांना त्रासदायक ठरत आहेत. रस्त्याशेजारी पार्क करण्यात येणाऱया वाहनांमुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत आहे. काहीवेळा ही वाहने गटारीला लागून पार्क करण्यात येतात. अशावेळी दुसऱया बाजूने जाणाऱया वाहनांना रस्ता नसतो. ती वाहने रस्ता आणि गटारीवरून नेण्याचा प्रयत्न वाहनचालक करीत असतात. त्यामुळे काहीवेळा ही वाहने गटारीमध्ये अडकून पडण्याचा प्रकारही घडत असतो. तसेच गटारीवरून जात असताना काही इमारतींच्या कौलांनादेखील धडक बसते. त्यामुळे इमारतधारकांचे नुकसान होत आहे.
गटारी व्यवस्थित बांधून त्यावर काँक्रिट घातल्यास वाहनधारकांना सोयीचे होवू शकते. पण याकडे दुर्लक्ष झाले आहे. मठ गल्ली परिसरात दररोज नवनवीन समस्या निर्माण होत असल्याने येथील गटारीच्या समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.