तर मनोरंजन इंडस्ट्रीला परंपराच आहे. काही दिवस अभिनयाचा अनुभव गाठीशी आला की दिग्दर्शन आणि त्यानंतर निर्मिती क्षेत्रात उतरून यशस्वी झालेले कलाकारही इंडस्ट्रीत आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे गायक, अभिनेता, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माता आणि परीक्षक अशा अनेक भूमिका पडद्यावर साकारणारे व्यक्तीमत्व म्हणजे अवधूत गुप्ते. तोडलस, जिंकलस, भावा, मित्रा हे शब्द रिऍलिटी शोमध्ये गाजवणाऱया अवधूतला खरंतर प्रत्येक कलेतला सूर सापडला आहे, पण तरीही अवधूत त्याची हरवलेली एक गोष्ट आजही शोधत आहे. अवधूत जेव्हा 20 वर्षापूर्वी दिल्लीत एका गाण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेला होता, त्या स्पर्धेतील अनुभव त्याने परतीच्या रेल्वे प्रवासात लिहून काढले. ते अनुभव वर्णन छापण्यासाठी एका प्रकाशक महिलेने नेले जे छापले तर नाहीच पण अवधूतला परतही दिलेले नाही.
अवधूत सांगतो, त्याकाळात रिऍलिटी शोमध्ये गाण्याच्या स्पर्धेचं शूटिंग एकाचवेळी होत असे आणि शूटिंग पूर्ण झालं की मगच तो शो टिव्हीवर दाखवला जाई. आज जशी सारेगमप, इंडियन आयडॉल, सूरसम्राट, सूर नवा ही स्पर्धा असते त्याच धर्तीवर ती स्पर्धा होती. हिंदी असल्याने देशभरातून स्पर्धक आले होते. मीही खूप तयारीने उतरलो होतो. आणि त्या स्पर्धेत मी पहिलं बक्षीस मिळवलं. प्रत्येक स्पर्धकासोबत त्यांचे आईबाबा, शिक्षक, गुरू आले होते, तर माझ्यासोबत कुणीच नव्हतं. पण त्या स्पर्धेने मला खूप काही शिकवलं. तो अनुभव मला पुढे कामी आला. मिळालेली ट्रॉफी घेऊन मी मुंबईच्या टेनमध्ये बसलो आणि तो सगळा अनुभव त्या प्रवासात लिहून काढला. जे अनुभव लेखन मी रेल्वे प्रवासात केलं होतं ते तसच हस्तलिखित स्वरूपात होतं. एकदा कुणाच्या मध्यस्थीने ते मला आठवत नाही, पण एक प्रकाशक महिला माझ्याकडे आल्या आणि काही लेखन आहे का छापायला असे विचारलं. मी ते अनुभववर्णन त्यांना दिलं. त्या छापण्यासाठी घेऊन गेल्या. ती ओरिजनल कॉपी होती. पुढे मी खूप दिवस वाट पाहिली पण ना ते लेखन छापून आलं ना माझी ओरिजनल कॉपी मला परत मिळाली.