अध्याय सातवा
यदुराजा आणि अवधुतांची एकदा भगवदभाग्याने गाठ पडली. राजाने मनोमन अवधुताना वंदन केले आणि म्हणाला, आपण सर्वज्ञाते दिसता पण आपले ज्ञातेपण कुठेही दाखवून देत नाही. काही करत नाही, आपल्याला कशाची इच्छाही नाही. यातूनच आपली शांती दिसून येते. आपण सस्वरूपात शोभून दिसता. आपल्याला आत्म्याचे अकर्तेपण समजले त्यामुळे आपण स्थिर आणि दक्ष आहात. ब्रह्मरसाप्रमाणे रसाळ बोलता. त्यापुढे अमृताची गोडी कुठे लागणार? ब्रह्मरस पिऊन, तृप्तीने ब्रह्मानंदात डुंबत आहात. निजरूपाबाबत सदा सावध असल्याने माझे तुझे म्हणत नाही. पण लोकांना हाच वेडेपणा वाटतो. तुम्ही निजानंदात परिपूर्ण आहात. त्या आनंदाचे कारण मला विशद करून सांगा. तुम्ही देहात असून विदेहस्थितीत आहात. तुम्हाला विषय बाधू शकत नाहीत ही अलिप्तपणाची प्राप्ती तुम्हाला कशी झाली? तुम्हाला राजाची भीड वाटत नाही. धनवंताची चाड नाही. दीनवचन गोड मानून त्यांना निजबोध देऊन त्यांचे लाड पुरवता. असे तुम्ही कृपाळू, आर्तबंधू, दीनदयाळू आहात. तरी आपल्याला माझी विनंती आहे की, आपण आत्मानंदाने परिपूर्ण असल्याचे कारण मला स्पष्ट करून सांगा. यदुराज ब्राह्मणभक्त, सत्त्वयुक्त, बुद्धिमंत आणि श्रद्धाळू होता म्हणून अतीव नम्रतेने आणि अर्जवाने तो अवधुताना विनवीत होता. त्याने त्यांचे मधूपर्कविधीने पूजन केले. त्याचा मृदू मंजुळ आवाज आणि जाणून घेण्याची कळकळ अवधुताना जाणवली. भगवंत आता यदु आणि अवधूत यांचा संवाद सांगतील. हा संवाद साधकांना खूपच मार्गदर्शक आहे. खरं म्हणजे यदुमहाराज स्वतः खूपच ज्ञानी आहेत. तरीसुद्धा निरनिराळय़ा विद्वानांच्या बरोबर धर्मचर्चा करायची त्यांना अतिशय आवड आहे. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, ‘उद्धवा, हा बोध सावचितपणे हृदयी धारण कर!’ अवधुताने बोलण्यास सुरुवात केली. क्षीरसागर जसा उचंबळावा किंवा मेघगर्जना व्हावी तसा अवधुताचा आवाज येऊ लागला. ‘हे राजचुडामणी! ऐक तू यदुकुळातील सूर्य आहेस. तू जो प्रश्न केला आहेस तो सुंदर गुणयुक्त आहे. तू निजानंदाचे कारण विचारलेस, त्याचे सविस्तर उत्तर देतो. हे राजा, गुरुवाचून कधी आत्मप्राप्ती होत नाही. आत्मबुद्धीचा विचार करत असताना मी अनेक गुरु केले. ज्या ज्या प्राण्यांमध्ये जे जे सद्गुण मला आढळले त्या त्या गुणापुरते मी त्याला गुरु केले. त्या गुणाचा मी स्वीकार केला. अशा पद्धतीने अनेक गुण धारण केल्यामुळे मी मुक्त झालो आहे आणि स्वेच्छेने फिरत आहे. राजा संसार तरून जाण्यासाठी सद्बुद्धीची गरज आहे. वैराग्याबरोबर सद्बुद्धीची जोड मिळाली की संसाराचा काहीच प्रभाव पडत नाही. त्याचे एका घावात दोन तुकडे होतात! ज्याचा त्याचा जो गुण मी घेतला त्याला त्याला मी गुरु केले. त्यामुळे माझे खूप गुरु झाले. संपूर्ण जग गुरुंनीच भरलेले मला दिसू लागले. ज्याचा गुण मी घेतला तो सहजच माझा गुरु झाला, पण मी एखाद्यातील दोष पाहून, त्या दोषाचा त्याग केला म्हणून तोही माझा गुरु झाला. राजा तूही असा विचार करून पहा, म्हणजे हे संपूर्ण जग गुरुमय दिसू लागेल.आता माझ्या मुख्य गुरुंची माहिती तुला देतो.’