पोलीस, पालिका प्रशासनाची कार्यवाही शून्य : वाढते अतिक्रमण ही समस्याच
वार्ताहर / निपाणी
निपाणी बाजारपेठेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथे होणारे खरेदी-विक्रीचे व्यवहार विश्वासार्ह मानले जातात. यामुळे निपाणी शहराबरोबरच परिसरातील ग्रामीण भाग आणि नजीकच्या महाराष्ट्र राज्यातून ग्राहक खरेदीच्या निमित्ताने निपाणी बाजारपेठेत येत असतो. पण वाढलेले अतिक्रमण आणि अवास्तव होणारे पार्किंग यामुळे बाजारपेठेचे स्वरूपच बदलून जात आहे. अतिक्रमण आणि अवास्तव पार्किंग यामुळे बाजारपेठ गुदमरत असल्याचे चित्र दिसत आह.s
निपाणी शहरात मुख्य मार्गाबरोबरच बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. हे अतिक्रमण काढून मार्ग मोकळे करून देण्याचा प्रयत्न अनेकवेळा करण्यात आला. पोलीस व पालिका प्रशासनाने काहीवेळा कठोर कारवाई करत अनेकवेळा अतिक्रमणांवर कारवाई केली. प्रसंगी जेसीबी देखील लावला पण कारवाईमध्ये कोठेच नियमितपणा नाही. यामुळे एकीकडे अतिक्रमण काढायचे आणि दुसरीकडे पुन्हा येरे माझ्या मागल्या, असा प्रत्यय सर्वांनाच येऊ पाहत आहे. पोलीस व पालिका प्रशासनाने अशा प्रकारावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. पण कोठेच कारवाई होताना दिसत नाही.
मुख्य मार्गांसह बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. पार्किंगचे नियोजन व्यवस्थित व्हावे. यासाठी पालिका प्रशासनाने नुकतेच पांढरे पट्टे मारून महत्त्वपूर्ण दिशा दिली. पांढऱया पट्टय़ाच्या आत वाहनांचे पार्किंग करा, असे आवाहन देखील करण्यात आले.
पण या आवाहनाला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. उलट पांढरेपट्टे सोडून वाहनांचे पार्किंग बिनधास्त केले जात आहे. अनेकजण तर दुकानातील वस्तू भर रस्त्यावर ठेवून दुकानाची जाहिरात करू लागले आहेत.
हा सर्व प्रकार रोखण्यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करणे गरजेचे आहे. बाजारपेठेत झालेले अतिक्रमण आणि वाहनांचे होणारे अवास्तव पार्किंग यावर कारवाई होणे गरजेचे आहे. वाहनांचे पार्किंग करण्यासाठी पालिका प्रशासनाने अनेकवेळा सभागृहात ठराव मांडला. पण पार्किंग व्यवस्था करण्यात कुठेच धन्यता मानली गेलेली नाही. मुरगूड रोड, चिकोडी रोड आणि कोल्हापूर रोडवर असणारे वाहनांचे पार्किंग आणि खाजगी वाहतूक व्यवस्था यामुळे तर विभागात गर्दी आणि वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे.