अध्याय दहावा
ईश्वराला कुणी पाहिले आहे का? कुणीच नाही. म्हणजेच ईश्वर नाही हे नक्की आहे. तेव्हा न पाहिलेल्या ईश्वराला पाहण्यासाठी समोर दिसणाऱया भोग्य वस्तूंचा त्याग करा असे म्हणणे चुकीचे आहे. त्याऐवजी समोर दिसणाऱया भोगवस्तू मिळवण्यासाठी कर्म करा आणि वस्तुंचा भोग घ्या. स्वर्गादी लोक त्यासाठीच तयार केले असून इथे न मिळणारे भोग मृत्यूनंतर तिथे जाऊन घ्या. असे म्हणणारे कर्मवादी लोक निरपेक्षतेने परमार्थ करणाऱयांचा बुद्धिभेद करत असतात. उद्धवाला उपदेश करताना भगवंत कर्मवाद्यांचे म्हणणे संपूर्णतया खोडून काढताना म्हणतात, सुख मिळवणे एवढे सोपे असते तर जगात दुःखी कुणी दिसलेच नसते पण बहुतांशी लोक असमाधानी असल्याने दुःखातच काळ घालवत असतात. बरं, स्वर्गात जाऊन सुख मिळवावे असा विचार करून कर्म करत राहिलात तर ते कर्म संपूर्ण निर्दोष हवे आणि संपूर्ण निर्दोष कर्म करणे बहुतांशी अशक्मय असते. काही ना काही न्यून प्रत्येक कर्मात राहतेच. हे न्यूनच मनुष्याचा घात करते आणि त्याचा स्वर्ग हुकतो. त्यातूनही समजा कुणाला स्वर्ग मिळालाच तरी षड्रिपुंची साथ सुटली नसल्याने स्वर्गातही मनुष्याच्या हेवेदावे, मत्सर आदि भावना जागृत असतातच मग तिथे तरी असमाधानी माणसाला कुठून सुख मिळणार? कारण जसजसे स्वर्गात मनुष्य राहतो तसतसे त्याचा पुण्यसाठा संपत येतो आणि त्याची रवानगी पुन्हा पृथ्वीवर होते.
सुखी होण्यासाठी मोठे कष्ट करून याज्ञिक स्वर्ग मिळवितात. पण शेवटी अतिशय दुःखी होऊन खाली तोंड करून पतन पावतात. स्वर्गातले सारे सुख अस्तास जाऊन गर्भवास मात्र कपाळी येतो. तसल्या त्या कामुकांच्या सुखाला आग का लागेना! सुखाच्या आशेने यज्ञ करणारे लोक फुकट फशी पडतात. उद्धवा, अशा रीतीने ‘स्वर्गसुख’ म्हणून जे म्हणतात, ते या रीतीने दुःख पावतात. मूर्ख लोकच स्वर्गाला सुख मानतात पण तो मार्ग काही निर्दोष नव्हे.
येथे कर्ममार्गाची प्रवृत्ती दोन प्रकारची असते. एकीत विधीप्रमाणे आचरण होते आणि दुसरीमध्ये अविधीने होते. आता जी तुला मी सांगितली, ती वेदविधानोक्त स्थिती होय. विधियुक्त कर्माचरणाने स्वर्गाची प्राप्ती होते. तसेच पुण्याच्या क्षयाने स्वर्गातून पतन कसे घडते तेही तुला कथन केले. आता अविधीचे आचरण कसे असते त्याचेही लक्षण ऐक.
ते दुर्मती लोक वेदविधींचे उल्लंघन करून कुत्सित लोकांच्या संगतीने अप्रवृत्तीची प्रवृत्ती करून कसा अधर्म करून सोडतात त्याविषयी सांगतो ऐक. जीव स्वभावतःच कामासक्त असतात, त्यामुळे त्यास इच्छिलेले विषय प्राप्त झाले की, ते अतिशय लंपट होऊन राहतात. इच्छित वस्तु प्राप्त झाली नाही तर मन व्याकुळ होऊन जाते. हा प्राणिमात्रांचा नेहमीचाच स्वभाव होय. अशा स्वभावाच्या मनुष्याला जर दुष्ट पुरुषाचा सहवास घडला, तर त्याची अधर्मावरच श्रद्धा बसते आणि तो अकर्माला प्रवृत्त होतो. चंचलपणामुळे मन हे माकडासारखेच आहे. त्यात त्याने दुष्टसंगतीरूप मदिरापान केले, त्यावर कामरूपी वृश्चिक चावला तर तो अद्वातद्वा वागू लागतो यात आश्चर्य ते काय ?
वेडय़ाच्या हातात कोलीत दिले तर तो सगळे जाळतच सुटणार. त्याप्रमाणे लंपटही दुष्टांच्या संगतीने होळी पेटवून आपला धर्म समूळ भस्म करून टाकतात. त्यात विवेकाला थारा असत नाही आणि तो कामशास्त्राच्याच मागे लागतो. कामशास्त्राच्या नादामुळे त्याची वासना वाढते आणि त्या वासनेमुळे अधर्म बळावतो. अधर्मामुळे अकर्म आरंभून निंद्य कर्माचे आचरण करतो. निंद्य कर्माची प्रवृत्ति होण्याला भोगाची लालूच हे मूळ आहे. भोगाच्या लालचीमुळेच अधर्माचा यथास्थित फैलाव होतो. अधर्म वाढला की परद्रव्य आणि परस्त्री यासाठी नानाप्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या लढविण्याच्या कामी शरीराला झिजवतो. स्त्रीसाठी अगदी काकुळतीला येतो. स्त्रीच्या ध्यासाने स्त्रwण बनतो. आणि ती स्त्री मिळविण्याकरिता प्राण्याची हिंसाकरण्यासही सुरुवात करतो.
(क्रमशः)