अध्याय बारावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, गोपींचे भाग्य मोठे बलवत्तर, म्हणूनच माझे शुद्ध सुख त्यांना मिळाले. माझ्या संगतीत त्यांनी अशा किती रात्री उपभोगल्या त्याची गणतीच नाही. तरी त्यांची तृप्ती म्हणून झाली नाही. माझ्यावर त्यांचे प्रेम वाढतच गेले. गोपिकांनी माझी भक्ती करून मला प्रसन्न करून घेतले आणि माझी सुखप्राप्ती होण्याकरिता एकांतात रासक्रीडा मागितली. त्या गोपिका म्हणजे वेदोदरातील श्रुती होत असे समज. श्रुतीच्या रूपानेसुद्धा त्यांना माझी प्राप्ती झाली नाही, म्हणून त्या “नेति नेति’’ म्हणजे येथे काही परमेश्वरप्राप्ती नाही, येथे काही परमेश्वरप्राप्ती नाही, असे म्हणून तेथून माघाऱया फिरल्या. माझ्या सुखाची संगती त्यांना तेथे मिळाली नाही. विषयबुद्धि हे मुख्य अज्ञान होय. ते असले की मी कधीही भेटत नाही हे लक्षात ठेव. किंवा वेदोक्तविधीचे ज्ञातेपण असले, तरीही मी पूर्णत्वाने भेटावयाचा नाही.
जाणीव आणि नेणीव निखालस नाहीशी झाल्यावर माझे आत्मसुख प्राप्त होते, श्रुतींनी हे निश्चितपणे जाणले, म्हणून त्या सुखासाठीच त्या गोकुळात आल्या. त्याच सर्व श्रुती गोपींच्या रूपाने गोकुळात आल्या असे समज. आणि रासक्रीडेच्या निमित्ताने एकांतामध्ये त्या माझ्या सुखप्राप्तीचा उपभोग घेऊ लागल्या. माझ्याठायी मनबुद्धी एकवटलेल्या त्यांना माझ्याशिवाय आपले आप्तेष्ट, स्वतःचे शरीर, इहलोक, परलोक अशा कशाचीही शुद्ध राहिली नव्हती. जसे मुनी समाधीमध्ये भगवंताशी एकरूप होऊन किंवा नद्या समुद्राला मिळून जाऊन आपले नामरूप विसरून जातात, तसे त्यांचे झाले होते. माझे गोकुळात राहणे घडले असताना त्या गोपी माझ्या ठिकाणी आसक्तचित्त झालेल्या होत्या. ही सर्व साद्यंत हकीकत मी तुला यथातथ्य रीतीने सांगितली. अशा त्या गोपींना मी अत्यंत नि÷gरपणाने कृतघ्नासारखा सोडून निघालो असताना त्या माझ्या वियोगाच्या असह्य दुःखाने पाषाणाना सुद्धा पाझर फुटले ! मग गोपींची काय अवस्था झाली असेल कल्पना कर ! मी त्यांच्यापासून दूर गेलो असतानाही त्या माझ्याच कथा, माझेच गुणानुवाद व सदोदित माझेच स्मरण असे करता करता त्या मत्स्वरूपाला पोचल्या. त्या दळणकांडण करताना माझी आठवण काढून माझे गुण मोठमोठय़ाने गात असत किंवा दही घुसळण्याचे कार्य त्यांनी चालविले असतानाही त्या माझेच चरित्रगायन करीत असत. अशावेळी मी तेथे नसूनही माझे दर्शन त्यांना होत असे. भगवंतांचं सांगणं पी सावळाराम यांच्या या गीतातून अत्यंत बहारदारपणे उमटले आहे. ते गीत असे, राधा गौळण करिते मंथन, अविरत हरीचे मनात चिंतन, राधा गवळणीचं मंथन म्हणजेच ताक घुसळणं चालू आहे. गाण्यातली शब्दरचना तर नितांत सुंदर आहे. त्यामुळे डोळय़ांसमोर एक जिवंत दृष्यच उभं राहतं. पुढील कडव्यात कवी म्हणतो, सुवर्ण चंपक यौवनकांती हिंदोलत ती मागे पुढती। उजव्या डाव्या झुलत्या हाती कृष्ण कृष्ण ते बोलती कंकण। हे वाचून आपल्या डोळय़ांसमोर ती ताक घुसळणारी आणि? प्रभूच्या विचारात दंग झालेली राधा उभी राहते. मंथन चालू असताना तिच्या दोन्ही हातांची इतकी सुंदर हालचाल होते आहे की, जणू तिच्या बांगडय़ा ‘कृष्ण कृष्ण’ असे बोलत आहेत. पुढं कवी म्हणतो, नाद मुरलीचा पडता कानी। बावरली ती गोकुळ हरिणी। छुमछुम छंदी घुंगुर चरणी। गुण गोविंदी गेली रंगून। मुरलीचा नाद कानी पडणारी ती बावरते. तिच्या पायातले पैजणही कृष्णगानात रंगले आहेत. यातलं तिसरे कडवे म्हणजे काव्यप्रतिभेचा कळसच राधेविण ते मंथन चाले। नवल बघाया नवनीत आले। ध्यान तियेचे उघडी डोळे। दृष्टीपुढती देवकीनंदन। कवी म्हणतो, मंथन तर चालू आहे मात्र राधा तर ते करत नसते. मग करतंय तरी कोण ? हे बघायला प्रत्यक्ष लोणीच वर आले आहे ! आता राधेलाही जाणवते आहे की, काही तरी वेगळे घडत आहे व ती जेव्हा डोळे उघडून पाहते तेव्हा तिच्या नजरेसमोर लोणी दिसत नाही तर साक्षात भगवान श्रीकृष्ण उभे आहेत. मंथनातून उत्पन्न होते ते लोणी म्हणजे साक्षात भगवंत आहेत का फक्त राधेलाच ते दिसत आहेत, सगळंच गूढ आहे. पण या गूढतेतही एक सौंदर्य आहे. जे मनाला मोहून टाकतं.
क्रमशः