भारतात केवळ आदिवासी आणि प्रचंड दारिद्रय़ असणाऱया भागात तेवढीच कुपोषणाची समस्या आहे, या धारणेला हादरा देणारा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये पाच वर्षाखालील बालकांमधील कुपोषण वाढ कायम आहे, शिवाय इतर भागात अतिस्थुलतेचे प्रमाण एक टक्क्मयांवरून चार टक्के इतके वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे विश्वगुरू असल्याच्या आणि जागतिक महासत्ता बनण्याच्या स्वप्नात तरंगणाऱया भारताचा भविष्यकाळ किती कमजोर असू शकेल याचे एक दुर्दैवी चित्र समोर आले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातसारखी कृषी, औद्योगिक आणि सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवून प्रगती केलेली राज्ये सुद्धा कुपोषणाच्या यादीत आली आहेत, हे वास्तव तर भयानकच. देशात वीस मुलांमागे एक मुल कुपोषित आहे. हे चौरस आहाराचे महत्त्व सांगणाऱया देशाचे वास्तव म्हणून मान्य करणे सहज पचणारे नाही, मात्र सत्य आहे. पाकिस्तान, बांग्लादेश या शेजारी राष्ट्रांपेक्षा आपली परिस्थिती खराब असणे भारतीय उपखंडात सुद्धा मानहानी करणारे, हे वास्तव क्रमप्राप्त आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये गरोदर स्त्रिया आणि नवजात बालके यांच्या आरोग्याकडे खास लक्ष दिल्यामुळे दोन वर्षाखालील बालकांच्या पोषण आहारात राज्यात सुधारणा दिसली आहे. मात्र पहिल्या हजार दिवसांचे बालकाच्या आरोग्याचे उद्दिष्ट मात्र तितक्मया प्रमाणात साध्य झालेले नाही. मुंबईपासून नजीक असणारा ठाणे, पालघरचा परिसर किंवा नंदुरबार, मेळघाट परिसर येथेच काय ती माता आणि बालकांच्या कुपोषणाची समस्या आहे असे आजपर्यंत महाराष्ट्राला वाटत होते. मात्र तिथली स्थिती सुधारण्यापेक्षा उर्वरित महाराष्ट्राची स्थिती बिघडली हे महाराष्ट्रासाठी जितके धोकादायक तितकेच देशातील अकरा राज्यांमध्ये बिघडलेल्या बाल आरोग्याचे वास्तव दर्शन धोकादायक आहे. भारतीय कुटुंबात मिळणारे अन्न हे पोषक आणि चौरस असल्याचे आजपर्यंत जगाला आपण सांगत होतो. मात्र आधुनिकीकरणाच्या लाटेने जे काही बदल झाले त्यातील काही चुकीचे बदल हे भारतीय कुटुंबांच्या मुळावर घाव घालणारे ठरत आहेत. पूर्वी या स्थितीला हरितक्रांतीला जबाबदार धरले जात होते. संकरित बियाणांमुळे अस्सल खाणे बंद झाले असे सांगितले जात होते. मात्र हे काही पूर्ण सत्य नाही. हरितक्रांतीने धान्याची उपलब्धता आणि पोषक मूल्ये सुद्धा वाढवली. भारतातील अनेक परिवारांमध्ये पिढय़ा न् पिढय़ा खुजी मुले जन्माला यायची. त्याच परिवारातील आता जन्माला आलेली अनेक मुले उंचीच्या बाबतीत आपल्या आधीच्या पिढीपेक्षा अधिक चांगली घडली हे संकरित बियाणांमधील सुधारणेचे सत्य नाकारता येत नाही. कोकणामध्ये 40 वर्षावरील अनेकांना पूर्वी गंभीर दृष्टिदोषाचा सामना करायला लागायचा. मात्र तांदळातील सुधारित वाणांमध्ये झालेल्या प्रगतीचा परिणाम आज नव्या पिढीत हा दृष्टिदोष नाहीसा झालेला दिसतो. कृषी क्षेत्रातील तज्ञांनी आपले काम केले, मात्र त्यापुढे केवळ आरोग्य यंत्रणेवर सर्व दोष देऊन महाराष्ट्र आणि देशातील धुरिणांनी योजना आखल्या आणि सामाजिक संस्थांवर जबाबदारी टाकून मोकळे झाले. परिणामी बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीनंतरसुद्धा भारताला कुपोषणाचे ढळढळीत अपयश पदरात घ्यावे लागले आहे. पाच वर्षाखालील 35 टक्के बालकांची वाढ खुंटणे, 25.6 टक्के शहरी भागातील मुलांमध्ये खुजेपणा, शहरी बालकांच्या कुपोषणात वाढ, शहरी आणि ग्रामीण दोन्हीकडे तीव्र कुपोषणाचे प्रमाण 9.4 वरून 10.9 टक्क्यांवर, कमी वजनाच्या बालकांची संख्या 30 वरून 33 टक्के तर अतिस्थुलतेचे प्रमाण चार वर्षांपूर्वीच्या 1.9 टक्केवरून चार टक्क्यापर्यंत वाढणे, त्यात शहरी बालकांचा आकडा जास्त असणे, त्यांच्यामध्ये श्वसनाच्या आजारांचे प्रमाण वाढत राहणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने रक्तक्षयाचे प्रमाण 53.8 टक्क्मयांवरून 68.9 टक्क्मयांवर पोहोचणे या सर्वच आकडय़ांना चिंताजनक मानले पाहिजे. स्त्रियांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण वाढले तेव्हाच त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले तर भविष्यात कुटुंबाचे आरोग्य बिघडणार हे समजून देशभरातील सर्व शासन यंत्रणांनी सुधारणा हाती घेतल्या. मात्र ज्याच्या हाती पैसा खेळला त्यांच्या ताटात सर्व प्रथिनांनीयुक्त अन्न असेल हा धुरिणांचा अंदाज सपशेल चुकला. नोबेल विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी गरिबी मापनात पोषणमूल्याचा समावेश केला होता. जो विचार जगातील भूकमुक्तीसाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त ठरला. त्यासाठी त्यांना नोबेल मिळाला. पुढे अभिजीत बॅनर्जी यांनी त्यांचा विचार अधिक पुढे नेला. मात्र जगाला दिशादर्शन करणाऱया या नोबेल विजेत्यांच्या मायभूमीत आज कुपोषणाची स्थिती आर्थिक सुबत्तेनंतरही बदललेली नाही. हे फारच गंभीर वास्तव आहे. देशातील आणि बंगालातील भूकबळी आणि दुष्काळ यांचा प्रभाव अमर्त्य सेन यांच्या विचारांवर होता. आज संपूर्ण भारतात पूर्वीपेक्षा आर्थिक सुस्थिती असूनही बालकांमधील अनारोग्याचे हे आव्हान जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहणाऱया भारताला सशक्त बनवेल की अशक्त याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. वीस वर्षानंतर या देशात बेरोजगारी किती असेल आणि आज जगातील सर्वात तरुण पिढी वृद्धत्वाकडे झुकायला लागेल तेव्हाची चिंता करतानाच वीस वर्षानंतर येणारी तरुणांची फळी शारीरिकदृष्टय़ा किती कमकुवत असेल याचा विचार आजच्या पालकांनी करून प्रथिनयुक्त आहार आपल्या आणि आपल्या परिसरातील लोकांच्या ताटात कसा येईल याच्यावर केवळ विचार नव्हे तर कृती करायची वेळ आली आहे. तसेही मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजचे वास्तव आहेच. सरकारनेही प्रसिद्धीची तंत्रे आता या क्षेत्रासाठी अधिक कशी उपयोगात आणता येतील आणि त्यातून प्रथिनयुक्त अन्न खाणे हीच सवय कशी होईल यावरही विचार केल्यास आजचा अशक्त दिसणारा भारत सशक्त बनण्यास मोठा हातभार लागेल.
Previous Articleगोडी अपूर्णतेची…
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.