उदय मडकईकर यांचा बाबूशवर निशाणा : पणजीत मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ
प्रतिनिधी /पणजी
निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे आम्ही जोरदार प्रचार सुरू केला आहे, घरोघरी भेटीवर भर दिला असून लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पणजीचे माजी महापौर तथा काँग्रेस नेते उदय मडकईकर यांनी दिली
एका वृत्तवाहिनीशी बोलताना श्री. मडकईकर यांनी काँग्रेसने पहिल्या टप्प्यातील प्रचारकार्य आरंभ केले असल्याचे सांगितले. पुढील काही दिवसात निवडणूक तारीख जाहीर होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने काँग्रेस कामाला लागली आहे. त्याचाच भाग म्हणून नुकतीच पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. लवकरच दुसरी यादी जाहीर होणार आहे. पणजीत अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. तरीही आम्ही प्रचारकार्य सुरू केले आहे. लोकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. त्याद्वारे भाजपच्या गत दहा वर्षांच्या हुकुमशाही, भ्रष्टाचारी राजवटीबद्दल लोकांना माहिती देत आहोत. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील विद्यमान काही मंत्र्यांनी चालविलेली वासनाकांडे, नोकऱयांची विक्री, कोटय़वधींचे आर्थिक घोटाळे, आदींचीही माहिती लोकांना देत आहोत.
भाजपच्या कारकिर्दीत कधी नव्हे एवढी महागाई वाढली आहे. पेट्रोल, गॅस यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. लोक त्रस्त झालेले आहेत. भरीस राज्यात बेरोजगारी वाढली आहे. उद्योगधंदे येत नाहीत. सरकारी नोकऱयांसाठी खुद्द मंत्र्यांकडूनच लाखो रुपयांची मागणी करण्यात येत आहे, हे सर्वकाही आम्ही नव्हे तर खुद्द भाजपमधील काही आमदार व कार्यकर्तेच जाहीररित्या सांगत आहेत. त्यावरून हे सरकार आणि भाजपाची एकुणच कार्यपद्धती कोणत्या स्तरावर पोहोचली आहे याचा अंदाज येतो, असे मडकईकर यांनी सांगितले. हे सर्व मुद्दे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
या सर्वापासून मुक्तता हवी असल्यास एकमेव पर्याय म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. त्यासाठी लोकांनी भाजपला नाकारावे. त्यांच्या सर्व आमदारांना घरी पाठवावे व काँग्रेसला साथ द्यावी. काँग्रेसच्या काळात लोक आनंदी होते. उद्योगधंदे सुरळीत चालत होते. ते तसेच पुढे चालायचे असल्याच काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणे काळाची गरज आहे, असे मडकईकर यांनी सांगितले.
पणजीच्या विद्यमान आमदाराने 100 दिवसात मांडवीतून पॅसिनो हटविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आतापर्यंत त्यांना पॅसिनो 100 इंचसुद्धा बाजूला हटविणे शक्य झालेले नाही, याची तमाम पणजीकरांना पूर्ण कल्पना आहे. पॅसिनो हा सध्या नाजूक विषय आहे. सरकारने त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे तो निवडणूक आश्वासनाचा विषय ठरू शकत नाही. आम्ही अशी अशक्यप्राय आश्वासने लोकांना देणार नाहीत. आमच्या जाहीरनाम्यात लोकहिताचीच आश्वासने असतील, अशी माहिती मडकईकर यांनी दिली.