शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची मागणी
प्रतिनिधी / करमाळा
करमाळा ते कोर्टी या 20 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून हे काम नियमानुसार होत नसल्यामुळे या रस्त्यावर झालेल्या अपघातात गेल्या तीन महिन्यात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले असून या रस्त्याच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.
उस्मानाबाद ते पाटस या रस्ता रुंदीकरणाचे काम गेली काही वर्षापासून सुरू असून सध्या करमाळा ते कोर्टी या अंतरावर वेगाने काम सुरू आहे. हे काम करत असताना संबंधित ठेकेदाराने एका बाजूची साईड पट्टी व पूर्ण रस्ता उखडून टाकला आहे, हा खोदलेला रस्ता व मूळ डांबरी रस्ता यात साधारणतः तीन ते चार फुटाचे अंतर आहे. या रस्त्यावर सध्या समोरासमोर वाहने आली तर समोरासमोर धडका होतात तर काही वाहने खोदलेल्या खड्ड्यात पडून छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेली दाट झाडी असेच ठेवून दोन झाडाच्या मधील माती काढत असल्यामुळे झाडे पडून मोठी अपघात होण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात दिवेगव्हाण येथील बाळकृष्ण सोनवणे हे या रस्त्यावरून जात असताना संबंधित कंपनीचा रोड रोलर आडवा आला, यावेळी दुसऱ्या बाजूला उतरण्यास जागा नसल्यामुळे बाळकृष्ण यांचे वाहन रोड रोलरला धडकले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. राजूरी येथील बाळासाहेब टापरे यांना समोरून येणाऱ्या उसाच्या वाहनांनी साईडन दिल्यामुळे त्यांचा ऊस वाहनाला धडकून जागीच मृत्यू झाला. यावेळी जर साईड पट्टी बेकायदेशीरपणे खोदलेली नसती तर हा अपघात झाला नसता.
अशा प्रकारे रोज या कोर्टी ते करमाळा या मार्गावर अपघात होत आहेत. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खाते करमाळा यांच्या अंतर्गत येत असून संबंधित खात्याचे अधिकारी या ठेकेदाराला अर्थपूर्ण तडजोडी करून पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे . वारंवार या भागातील लोकांनी तक्रारी करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी डोळ्याला पैशाची काळी पट्टी बांधून बसल्याचे दिसून येत आहे .
याबाबत बोलताना अॅङ प्रमोद जाधव म्हणाले कि, मी या रस्त्यावरून माझ्या गावी जातो; मला रोज मी घरी जिवंत पोहोचेल का नाही अशी भीती वाटते, पण शेती करण्यासाठी रोज गावाकडे जावे लागते, माझ्यासारख्या हजारो शेतकरी व हजारो वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात, रोज दोन चार तरी अपघात होतात, संबंधित ठेकेदार आणि रस्त्याच्या कडेला अपघाती जागा समोर रस्ता खोदला आहे ,असे सूचना फलक सुद्धा लावलेले नाहीत, या रस्त्यावरून विहाळ, बारामती ॲग्रो, अंबालिका या साखर कारखान्याचे जवळपास सातशे ते आठशे ट्रॅक्टर रोज ये-जा करतात. व यातूनच मोठ मोठे अपघात होत आहेत.यापुढेही बांधकाम खात्याने योग्य काळजी न घेतल्यास येणाऱ्या दोन तीन महिन्यात सुद्धा निष्पाप जीवांचा बळी जाईल अशी भिती अॅङ प्रमोद जाधव यांनी व्यक्त केली.