लखीमपूर खेरी प्रकरणी 11 तासांच्या चौकशीनंतर अटक, विरोधकांची टीका
लखनौ / वृत्तसंस्था
चार शेकऱयांच्या अंगावर कार घालून त्यांच्या हत्येला कारणीभूत झाल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र अशिश मिश्रा याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीक कोठडी दिली आहे. त्याला शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. त्यापूर्वी सलग 11 तास त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने सहकार्य न केल्याचा, तसेच विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे टाळल्याचा आरोप तपास अधिकाऱयांनी केला आहे .
अशिश याला त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्ष तसेच आंदोलक शेतकरी संघटनांनी केली होती. अटक न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला होता. अशिश मिश्रा शनिवारी सकाळी स्वतःहून विशेष तपास दलाच्या कार्यालयात उपस्थित झाला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याची सलग 11 तास चौकशी करण्यात आली, अशी माहिती देण्यात आली.
दुसरा एफआयआरही सादर
लखीमपूर खेरी प्रकरणी शेतकऱयांचे मृत्यू झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात कारचा चालक, भाजपचे दोन कार्यकर्ते आणि एक पत्रकार जमावाच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडले होते. त्यासंबंधातही तपास यंत्रणेने स्वतंत्र एफआयआर सादर करुन घेतला आहे. यामध्ये कोणाला आरोपी करण्यात आले आहे, याची माहिती त्वरित मिळू शकली नाही. या प्रकरणाची चौकशीही एसआयटी करीत आहे.
पूर्वनियोजित असल्याचा आरोप
शेतकऱयांना कार घालून मारण्याचा प्रकार पूर्वनियोजित होता, असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. घटनाक्रम पाहता असा संशय घेण्यास जागा आहे. त्यामुळे या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली. आरोपींना त्वरित अटक न झाल्यास शहीद किसान यात्रेचे आयोजन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
मंत्रीपुत्राला संरक्षणाचा आरोप
उत्तर प्रदेशातील योगी सरकार केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राला संरक्षण देत आहे, असा आरोप काँगेसने केला. अशिश मिश्रा याच्या संदर्भात सौम्य धोरण स्वीकारले जात आहे. योग्य प्रकारे त्याची चौकशी केली जाण्याची शक्यता नाही. आरोपपत्रातही सर्व सत्ये मांडण्यात आलेली नाहीत, असे काँगेसचे म्हणणे आहे.
आतापर्यंत तीघांना अटक
लखीमपूर खेरी प्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अशिश मिश्राला अटक करण्यापूर्वी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनाही चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी विशेष तपास दल स्थापन करण्यात आले असून त्याचे नेतृत्व आयजीपी (निवासी) उपेंद्र अग्रवाल करीत आहेत. त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
मिश्रांच्या राजीनाम्याची मागणी
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी काँगेससह अनेक विरोधी पक्षांनी केली आहे. उच्चपदस्थांच्या अनुमतीशिवाय शेतकऱयांना मारण्याचा प्रकार घडलेला नाही, असा आरोप एआयएमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी केला. या प्रकरणी शेतकऱयांना न्याय मिळण्याची शक्यता नसल्याचेही वक्तव्य त्यांनी शनिवारी पेले होते.
भाजपकडून प्रत्यारोप लखीमपूर खेरी प्रकरणात राजकीय पोळय़ा भाजून घेण्याचा प्रकार विरोधी पक्षांकडून होत आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्वरित कारवाई करुन आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी विशेष तपास दलाकडून केली जात आहे, त्यामुळे विरोधकांनी राजकारण थांबवावे, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले.