भारत आणि ब्रिटन संयुक्तरित्या औषधी गुणांचे परीक्षण करणार
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे आयुष मंत्रालय आणि ब्रिटनचे ‘स्कूल ऑफ हायजिन’ या दोन्ही संस्थांनी भारतात लोकप्रिय असणाऱया अश्वगंधा वनस्पतीच्या औषधी गुणधर्मांचे परीक्षण संयुक्तरित्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी काही दिवसांपूर्वी आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि ब्रिटनची संस्था यांच्यात सांमजस्य करार करण्यात आला आहे.
अश्वगंधा ही वनस्पती भारतात औषध म्हणून सहस्रावधी वर्षांपासून उपयोगात आहे. ही वनस्पती कार्यशक्ती वाढविण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती सुदृढ करण्यासाठी आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी उपयोगात आणली जाते. ही वनस्पती मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असल्याने तिच्यापासून निर्माण करण्यात आलेली औषधे सर्वांना परवडण्यासारखी असतात. त्यामुळे ती लोकप्रिय आहे.
कोरोनावर गुणकारी
कोरोनामुळे माणसाठी रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. ज्या व्यक्तींना दीर्घकालीन कोरोनाने सतावले आहे, त्यांना ही रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर अनेक संसर्ग किंवा विकार होण्याची शक्यता असते. मात्र, अश्वगंधा वनस्पती अशा रुग्णांना बरे करण्यास उपयुक्त ठरली आहे. अनेक रुग्णांवर या वनस्पतीच्या औषधांचे प्रयोग करण्यात आले असून ते यशस्वी ठरल्याचे सांगण्यात येते.
शास्त्रशुद्ध परीक्षण करणार
या वनस्पती आरोग्य विषयक उपयुक्तता चर्चेत असल्याने तिच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयोग करण्यात येणार आहेत. या वनस्पतीमध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांचे पृथक्करण करुन त्यांच्यात कोणते औषधी मूल्य आहे, याचा शास्त्रशुद्ध शोध घेण्यात येणार आहे. सध्या कोरोनावर जगभरात अनेक लसी आणि औषधांची निर्मिती करण्याचे प्रयोग सुरू आहेत. त्यात काही वनस्पतींवरही परीक्षणे सुरू आहेत. आता यात अश्वगंधा या वनस्पतीची भर पडली आहे.
भारताचा लाभ शक्य
हीं वनस्पती कोरोना किंवा अन्य विकारांवर औषध म्हणून प्रभावी असल्याचे आधुनिक शास्त्राप्रमाणे सिद्ध झाल्यास भारताच्या दृष्टीने ते लाभदायक होईल. ही मूळ भारतीय वनस्पती आहे. तिचे उत्पादन भारतातच प्रामुख्याने आणि मोठय़ा प्रमाणात होते. साहजिकच तिच्यापासून भारतात औषधे निर्माण करुन ती जगभरात निर्यात करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो., असे तज्ञांचे मत आहे.
संभाव्य निष्कर्षांसंबंधी आशावाद
ड अश्वगंधा वनस्पतीचे औषधी गुणधर्म सिद्ध होतील अशी तज्ञांना आशा
ड आयुर्वेदात या वनस्पतीचे महत्व मोठे, प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त