अमित मिश्रा यंदाच्या आयपीएल हंगामातून बाहेर पडला, त्याचक्षणी रविचंद्रन अश्विनने 999 हा जर्सी क्रमांक बदलत 99 असा केला. अमित मिश्रा संघात असताना त्याचा जर्सी क्रमांक 99 होता. त्यामुळे, अश्विनने 999 हा जर्सी क्रमांक निवडला. पण, मिश्रा बाहेर पडल्यानंतर त्याने 99 क्रमांकाला पसंती दिली. आता जर्सी तर तयार आहेत. पण, 999 ऐवजी 99 क्रमांकाला पसंती देण्यासाठी त्याने यातील पहिल्या 9 अंकांवर स्टीकर लावला. पण, हा क्रमांक बदलला तरी अद्याप तो बहरात येण्यासाठी झगडत असल्याचे चित्र आहे.
यंदाच्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध लढतीत अश्विनने दोन-एक बळी घेतले. पण, दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेरही जावे लागले होते. पुढे तो सनरायजर्स हैदराबाद व चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध खेळू शकला नाही. पण, नंतर केकेआरविरुद्ध तो पुन्हा एकदा संघात परतला. पुढे 2 सामन्यात अश्विनला एकच बळी घेता आला असला तरी धावा रोखण्यावर त्याने उत्तम लक्ष केंद्रित केले.
आरसीबीविरुद्ध अश्विनला 4 षटकात 26 धावा मोजाव्या लागल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्याने धावा कशा रोखता येईल, यावर आपला फोकस ठेवला. आता जर्सी क्रमांक 999 ऐवजी 99 हा निवडण्याचे देखील खास कारण आहे. ते म्हणजे, राष्ट्रीय संघातून खेळत असताना देखील अश्विनचा जर्सी क्रमांक 99 हाच असतो. अर्थात, जर्सीचा क्रमांक बदलल्यानंतरही अश्विनला अद्याप त्याच्या लौकिकाला साजेसा सूर सापडलेला नसून आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात त्याला केवळ 7 बळीच घेता आले आहेत. त्याने येथे 22 षटके गोलंदाजी केली असून त्यात 151 धावा दिल्या. 2 धावात 2 बळी ही त्याची हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजी आहे. अश्विनची बळी घेण्याची सरासरी 22.57 व प्रति षटकामागे इकॉनॉमी 7.8 इतकी राहिली आहे.