इंग्लंडविरुद्ध चौथ्या व शेवटच्या कसोटीत डावाने विजय, पंत सामनावीर, आर. अश्विन मालिकावीर
अहमदाबाद / वृत्तसंस्था
अक्षर पटेल (5-48) व रविचंद्रन अश्विन (5-47) यांनी प्रत्येकी 5 फलंदाज गारद करत इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळण्यात ‘फिफ्टी-फिफ्टी’ योगदान दिल्यानंतर भारताने येथील चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 1 डाव व 25 धावांनी एकतर्फी धुव्वा उडवला आणि 4 सामन्यांची ही मालिका 3-1 फरकाने जिंकली. या विजयासह विराटसेनेने उद्घाटनाच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जोरदार धडक मारली. अवघ्या अडीच दिवसातच भारताने ही लढत जिंकली.
प्रारंभी, भारताने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 365 धावा जमवत डावाअखेर 160 धावांची आघाडी घेतली. यामुळे, अडचणीत आलेल्या इंग्लंडची खराब सुरुवात झाली आणि त्यांचा दुसरा डाव अवघ्या 135 धावांमध्येच गारद करत भारताने डावाने विजय प्राप्त केला.
वास्तविक, फायनलमधील स्थाननिश्चितीसाठी भारताला ही कसोटी बरोबरीत राखली तरी पुरेसे ठरणार होते. पण, अक्षर पटेल व अश्विनच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा दुसरा डाव 54.5 षटकात अवघ्या 135 धावांमध्येच गुंडाळला गेला. शतकवीर रिषभ पंत सामनावीर तर मालिकेत 32 बळी घेणारा रविचंद्रन अश्विन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉनसारख्या तज्ञांनी खेळपट्टीच्या स्वरुपावर टीका केली आणि अशा प्रकारच्या खेळपट्टीवर संघांनी लोटांगण घालणेच अपेक्षित असते, असे म्हटले. पण, याच खेळपट्टीवर भारताने पहिल्या डावात 365 धावांचा डोंगर रचल्याने या टीकेचाही अप्रत्यक्ष समाचार घेतला गेला. इंग्लंडला दोन्ही डावात मिळून केवळ 340 धावा करता आल्या.
अक्षर पटेल आपल्या पदार्पणाच्या मालिकेत ‘पॉवरहाऊस परफॉर्मर’ ठरला. पण, रवींद्र जडेजा तंदुरुस्त होऊन परतेल, त्यावेळी अक्षर पटेलला पुढील संधी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते, इतकी सध्या संघातील प्रत्येक जागेसाठी निकोप स्पर्धा आहे.
भारताने तिसऱया दिवशी 7 बाद 294 धावांवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर त्यात आणखी 69 धावांची भर घातली. यात वॉशिंग्टन सुंदरच्या फटकेबाजीचा प्रामुख्याने समावेश राहिला. पण, शेवटचे 3 फलंदाज एकाही धावेची भर न घालता बाद झाल्याने वॉशिंग्टन सुंदरला शतकाने अवघ्या 4 धावेने हुलकावणी दिली. तो 174 चेंडूत 96 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडतर्फे बेन स्टोक्सने 4, अँडरसनने 3 तर जॅक लीचने 2 बळी घेतले.
प्रत्युत्तरात इंग्लंडची दाणादाण
पहिल्या डावाअखेर 160 धावांची पिछाडी घेऊन दुसऱया डावात फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंडची येथील खेळपट्टीवर अश्विन-अक्षरसमोर आणखी एकदा अक्षरशः दाणादाण उडाली. झॅक क्रॉली (5), डॉम सिबली (3), जॉनी बेअरस्टो (0) हे आघाडीचे पहिले 3 फलंदाज एकेरी धावसंख्येतच गारद झाले. कर्णधार जो रुटने 30 धावा केल्या. मात्र, अनुभवी बेन स्टोक्स (2), ओली पोप (15) हे स्वस्तात बाद झाले. सातव्या स्थानावरील डॅन लॉरेन्सने सर्वाधिक 50 धावांचे योगदान दिले. पण, तोवर हा सामना इंग्लंडच्या हातातून जवळपास निसटला होता. बेन फोक्स (13), डॉम बेस (2), जॅक लीच (2) केवळ हजेरी लावण्यापुरते मैदानात आले तर जेम्स अँडरसन एका धावेवर नाबाद राहिला. या पडझडीमुळे इंग्लंडचा दुसरा डाव 54.5 षटकात अवघ्या 135 धावांमध्येच खुर्दा झाला.
भारतीय संघातर्फे रविचंद्रन अश्विनने 47 धावात 5 तर अक्षर पटेलने 48 धावात 5 बळी घेत इंग्लंडचा दुसरा डाव गुंडाळण्यात ‘फिफ्टी-फिफ्टी’ योगदान दिले.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव- सर्वबाद 205
भारत पहिला डाव- शुभमन गिल पायचीत गो. अँडरसन 0 (3 चेंडू), रोहित शर्मा पायचीत गो. स्टोक्स 49 (144 चेंडूत 7 चौकार), चेतेश्वर पुजारा पायचीत गो. लीच 17 (66 चेंडूत 1 चौकार), विराट कोहली झे. फोक्स, गो. स्टोक्स 0 (8 चेंडू), अजिंक्य रहाणे झे. स्टोक्स, गो. अँडरसन 27 (45 चेंडूत 4 चौकार), रिषभ पंत झे. रुट, गो. अँडरसन 101 (118 चेंडूत 13 चौकार, 2 षटकार), रविचंद्रन अश्विन झे. पोप, गो. लीच 13 (32 चेंडूत 2 चौकार), वॉशिंग्टन सुंदर नाबाद 96 (174 चेंडूत 10 चौकार, 1 षटकार), अक्षर पटेल धावचीत (बेअरस्टो-रुट) 43 (97 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), इशांत शर्मा पायचीत गो. स्टोक्स 0 (1 चेंडू), मोहम्मद सिराज त्रि. गो. स्टोक्स 0 (3 चेंडू). अवांतर 19. एकूण 114.4 षटकात सर्वबाद 365.
गडी बाद होण्याचा क्रम
1-0 (शुभमन, 0.3), 2-40 (पुजारा, 23.6), 3-41 (विराट, 26.4), 4-80 (रहाणे, 37.5), 5-121 (रोहित, 49.6), 6-146 (अश्विन, 58.1), 7-259 (रिषभ पंत, 84.1), 8-365 (अक्षर, 113.6), 9-365 (इशांत, 114.1), 10-365 (सिराज, 114.4).
गोलंदाजी
जेम्स अँडरसन 25-14-44-3, बेन स्टोक्स 27.4-6-89-4, जॅक लीच 27-5-89-2, डॉम बेस 17-1-71-0, जो रुट 18-1-56-0.
इंग्लंड दुसरा डाव ः झॅक क्रॉली झे. रहाणे, गो. अश्विन 5 (16 चेंडू), डॉम सिबली झे. पंत, गो. पटेल 3 (21 चेंडू), जॉनी बेअरस्टो झे. रोहित, गो. अश्विन 0 (1 चेंडू), जो रुट पायचीत गो. अश्विन 30 (72 चेंडूत 3 चौकार), बेन स्टोक्स झे. कोहली, गो. पटेल 2 (9 चेंडू), ओली पोप यष्टीचीत पंत, गो. पटेल 15 (31 चेंडूत 1 षटकार), डॅन लॉरेन्स त्रि. गो. अश्विन 50 (95 चेंडूत 6 चौकार), बेन फोक्स झे. रहाणे, गो. पटेल 13 (46 चेंडू), डॉम बेस झे. पंत, गो. पटेल 2 (6 चेंडू), जॅक लीच झे. रहाणे, गो. अश्विन 2 (31 चेंडू), जेम्स अँडरसन नाबाद 1 (1 चेंडू). अवांतर 12. एकूण 54.5 षटकात सर्वबाद 135.
गडी बाद होण्याचा क्रम
1-10 (झॅक क्रॉली, 4.4), 2-10 (बेअरस्टो, 4.5), 3-20 (सिबली, 9.6), 4-30 (बेन स्टोक्स, 13.1), 5-65 (ओली पोप, 24.5), 6-65 (रुट, 25.1), 7-109 (बेन फोक्स, 43.1), 8-111 (डॉम बेस, 45.1), 9-134 (जॅक लीच, 54.2), 10-135 (लॉरेन्स, 54.5).
गोलंदाजी
मोहम्मद सिराज 4-0-12-0, अक्षर पटेल 24-6-48-5, रविचंद्रन अश्विन 22.5-4-47-5, वॉशिंग्टन सुंदर 4-0-16-0.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप यादीत भारताची दुसऱया स्थानी झेप
चौथ्या व शेवटच्या कसोटीत इंग्लंडचा डावाने धुव्वा उडवल्यानंतर भारताने आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली. आयसीसीने ट्वीट करत याची माहिती दिली. भारताने या स्पर्धेच्या साखळी फेरीअखेर 520 गुण प्राप्त केले असून यात 12 विजय, 4 पराभव व 1 अनिर्णीत अशी कामगिरी नोंदवली. आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आता भारत व न्यूझीलंड आमनेसामने भिडतील.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिका
संघ / विजयाची टक्केवारी / गुण / मालिका / सामने
विजय / पराभव / अनिर्णीत
भारत / 72.2 / 520 / 6 / 12 / 4 / 1
न्यूझीलंड / 70.0 / 420 / 5 / 7 / 4 / 0
ऑस्ट्रेलिया /69.2 / 332 / 4 / 8 / 4 / 2
इंग्लंड / 61.4 / 442 / 6 / 11 / 7 / 3
बॉक्स
कसोटी मालिकेत दोनवेळा 30 बळी घेण्याचा अश्विनचा नवा विक्रम
ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन एका मालिकेत 30 किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवण्याचा दोनवेळा पराक्रम गाजवणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्ध झालेल्या या मालिकेत 14.71 च्या सरासरीने 32 बळी घेतले. यापूर्वी 2015 मध्ये देखील त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 31 बळी घेतले होते. बिशन सिंग बेदी, हरभजन सिंग, बीएस चंद्रशेखर, कपिलदेव या अन्य भारतीय गोलंदाजांनी प्रत्येकी एकदा मालिकेत 30 किंवा त्याहून अधिक बळी मिळवले आहेत. अश्विनने इंग्लंडविरुद्ध याच मालिकेत 400 कसोटी बळींचा विक्रमही सर केला आहे. अहमदाबादमध्ये तिसऱया कसोटीत त्याने हा माईलस्टोन गाठला होता.
सुनील गावसकर यांचा पदार्पणाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त बीसीसीआयतर्फे खास सन्मान
कसोटी पदार्पणाची 50 वर्षे पूर्ण करणारे माजी कर्णधार व विद्यमान ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांचा शनिवारी बीसीसीआयतर्फे स्मृतिचिन्ह व खास कसोटी कॅप देऊन सन्मान केला गेला. तिसऱया दिवसाच्या खेळात उपाहारादरम्यान बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या हस्ते सनींना गौरवले गेले. गावसकर या सामन्यात समालोचनही करत होते.
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी ट्वीटरवरुन गावसकर यांना शुभेच्छा दिल्या. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गावसकर यांच्या देदीप्यमान योगदानाची मुक्तकंठाने प्रशंसा करताना गावसकर अव्वल दर्जाचे सलामीवीर राहिले, शिवाय, खेळाचे महान ब्रँड ऍम्बॅसेडरही राहिले, असे नमूद केले.
गावसकर यांनी 1971 ते 1987 या कालावधीत 125 कसोटी, 108 वनडे सामने खेळले. शिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा विक्रम करणारे ते पहिले फलंदाजही ठरले.