माजी सलामीवीर, ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांचे मत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘साऊदम्पटनमध्ये सध्या अतिशय उष्ण वातावरण आहे. असेच वातावरण कायम राहून खेळपट्टी टणक होत गेली तर सामना पुढे सरकेल, त्याप्रमाणे फिरकी गोलंदाजीला पोषक वातावरण असू शकते. या पार्श्वभूमीवर, रविचंद्रन अश्विन व रविंद्र जडेजा यांना खेळवणे फलदायी ठरु शकते’, असे मत माजी सलामीवीर, ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांनी मांडले. भारत-न्यूझीलंड यांच्यात शुक्रवार दि. 18 पासून आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप फायनल खेळवली जाणार असून त्या पार्श्वभूमीवर गावसकर बोलत होते. या लढतीसाठी गावसकर यांचा समालोचन पथकात समावेश असून सध्या ते साऊदम्प्टनमध्ये आहेत.
‘अश्विन व जडेजा यांना संधी दिल्यास फलंदाजी आणखी मजबूत होऊ शकेल. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हवामान व खेळपट्टीचे स्वरुप पाहून त्यानुसार निर्णय घ्यावे लागतील’, असे गावसकर पुढे म्हणाले. न्यूझीलंडने अलीकडेच इंग्लंडविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली असली तरी भारतीय संघ देखील पूर्ण सज्ज आहे, याचा त्यांनी येथे उल्लेख केला.
इरापल्ली प्रसन्ना यांच्यासमवेत खेळलेल्या गावसकरांनी या अंतिम लढतीत अश्विनची गोलंदाजी निर्णायक ठरु शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. ‘इरापल्ली प्रसन्नाला ‘विली फॉक्स’ असे म्हटले जायचे. कारण, प्रसन्ना प्रतिस्पर्धी फलंदाजाला खराब फटके मारणे भाग पाडत असे. प्रसन्नाची गोलंदाजी इतकी गूढ असायची की, त्यामुळे त्यांच्या सरळ चेंडूवरही फलंदाज झेल देत असे किंवा त्रिफळाचीत होत परतत असे. नंतरच्या कालावधीत हरभजनने देखील आपल्या गोलंदाजीत बरेच वैविध्य आणले. त्यानंतर अश्विन आपल्या भात्यातील फ्लिकर किंवा कॅरम बॉलमुळे अधिक भेदक ठरत आला आहे’, असे निरीक्षण गावसकर यांनी नोंदवले.
काय आहे विराटच्या यशाचे रहस्य?
इंग्लंडमध्ये इंग्लिश गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यात विराट कोहली बऱयापैकी सातत्य राखू शकला आहे तर अजिंक्य रहाणे, मुरली विजय (2014) चेतेश्वर पुजारा (2018) यांनी शतके झळकावत तेथील खेळपट्टय़ांवर प्रभावी फलंदाजी करता येऊ शकते, याचे दाखले दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, विराट सातत्य राखण्यात का यशस्वी झाला, याची कारणमीमांसा सनीनी येथे केली.
‘इंग्लंडमध्ये चेंडू शक्य तितक्या जवळून खेळणे अधिक योग्य ठरते आणि विराटची शैली ‘ऑन द राईज’ खेळण्यावर भर देणारी आहे. इंग्लंडविरुद्ध अलीकडील मालिकेत विराट शतक झळकावू शकला नव्हता. पण, चेन्नई कसोटीत त्याची 60 धावांची खेळी फिरकी गोलंदाजी कशी खेळावी, याचा उत्तम दाखला देऊन गेली. पाटा स्वरुपाच्या खेळपट्टय़ांवर आणि स्विंग-सीम गोलंदाजीला पोषक खेळपट्टय़ांवर विराट नेहमी लवचिक बदल करतो, हे देखील त्याच्या सातत्याचे महत्त्वाचे कारण आहे’, असे गावसकर याप्रसंगी म्हणाले.
2 वर्षांपूर्वी, आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने 5 धमाकेदार शतके झळकावली आणि त्यातील द. आफ्रिकेविरुद्धचे शतक अधिक प्रतिकूल खेळपट्टीवरील होते. या दोन वर्षात त्याची फलंदाजी अधिक प्रगल्भ झाली आहे, याचा संघाला लाभ होऊ शकेल, असेही गावसकरांनी येथे नमूद केले. 6 व्या स्थानावरील रिषभ पंतमुळे फलंदाजी अधिक मजबूत झाली असून शुभमन, रोहित, विराट, चेतेश्वर व अन्य फलंदाजांनी उत्तम शॉट सिलेक्शनवर भर दिला तर भारत उत्तम धावा नोंदवू शकेल, असे ते शेवटी म्हणाले.
साऊदम्प्टनवर येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता
साऊदम्प्टनमध्ये सध्या उष्ण वातावरण असले तरी गुरुवारपासून संततधार कोसळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हवामान कसे असेल, यावर देखील बरीच समीकरणे अवलंबून असतील. मागील काही दिवसात येथील कमाल तापमान 26 डिग्री सेल्सियस इतके आहे. आयसीसीने जारी केलेल्या ‘प्लेईंग कंडिशन्स’नुसार, सामना अनिर्णीत राहिल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते जाहीर केले जाणार आहे.