वृद्ध पेन्शनधारकांची परवड : कागदपत्रांची जोडणी केली नसल्याचे कारण
प्रतिनिधी /बेळगाव
राज्य शासनाकडून विविध पेन्शन योजना राबविण्यात येतात. मात्र काही कागदपत्रांची जोडणी केली नसल्याचे कारण देऊन असंख्य पात्र लाभार्थींची पेन्शन बंद करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयात विचारणा केली असता टेझरी कार्यालयात चौकशी करा, असे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रकार सुरू आहे. परिणामी वृद्ध पेन्शनधारकांची परवड होत आहे.
वृद्धाप पेन्शन, विधवा पेन्शन, तसेच दिव्यांग पेन्शन अशा विविध योजना राबविण्यात येतात. याअंतर्गत शेकडो लाभार्थी या योजनांचा लाभ घेत आहेत. मात्र 30 ते 45 वयोगटातील नागरिकांनाही वृद्धाप पेन्शन देण्यात आल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. याबाबत शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन काही लाभार्थींना अपात्र ठरवून पेन्शन रद्द करण्यात आली आहे. मात्र यामधून काही पात्र आणि वृद्ध नागरिकांचे वेतन रद्द करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. मागील 5 ते 6 महिन्यांपासून पेन्शन जमा झाली नाही. त्यामुळे तहसीलदार कार्यालयात चौकशी करण्यासाठी धावपळ करीत आहेत. पण या ठिकाणी पेन्शन मंजुरी क्रमांकाची विचारणा केली जात आहे. पेन्शन मंजुरीपत्र दाखविल्यानंतर सदर मंजुरीपत्रावर क्रमांक नसल्याचे सांगून पोस्ट कार्यालयातील पावती द्या, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच टेझरी कार्यालयातून पेन्शन क्रमांक घेऊन या, असे सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात पोस्ट कार्यालय किंवा टेझरी कार्यालयात हा क्रमांक उपलब्ध होत नाही. वास्तविक पाहता तहसीलदार कार्यालयातूनच पेन्शन मंजूर केली जाते. तसेच शासनाकडे तहसीलदार कार्यालयाकडूनच आवश्यक माहिती दिली जाते. तरीदेखील पेन्शनधारकांची माहिती संगणकावर नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच माहिती नसल्याचे कारण देत नवीन अर्ज करण्याची सूचना वृद्ध नागरिकांना करण्यात येत आहे. त्यामुळे वृद्ध पेन्शनधारकांना विविध कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. तहसीलदार कार्यालयातील कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे वृद्ध पेन्शनधारकांच्या समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.